नवी मुंबई : मराठी साहित्य संस्कृती व कलामंडळ – नवी मुंबई आणि शिवतुतारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने “संयुक्त महाराष्ट्राचा संग्राम : जिंकूनही हरलेली लढाई…” या विषयावरील हुतात्मा स्मृती दिनानिमित्त परिसंवादाचे आयोजन गुरुवार, २० नोव्हेंबर २०२५ रोजी साहित्य संघ मंदिर, वाशी येथे करण्यात आले. या कार्यक्रमाला नवी मुंबई–ठाणे परिसरातील तब्बल १०७ मराठी सामाजिक संस्थांनी सहभाग नोंदवत संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या १०७ हुतात्म्यांना ‘एक पणती हुतात्म्यासाठी’ या उपक्रमाद्वारे अभिवादन केले.कार्यक्रमाची सुरुवात सुरेख बासरीवादनाने झाली, त्यानंतर गीतकार,शाहीर मनोहर गोळुंबरे यांनी “माझी मैना गावाकडे राहिली…” हे फक्कड गीत सादर करून रसिकांची मने जिंकली. या परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर, गोवर्धन देशमुख (मराठी एकीकरण समिती – महाराष्ट्र) आणि संजय यादवराव (शिव स्वराज्य मराठी लोक चळवळ) यांनी हुतात्म्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मराठी भाषा, संस्कृती, रोजगार आणि मराठी एकजुटीवर महत्त्वपूर्ण विचार मांडले.ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर यांनी मराठी समाजातील विस्कळीतपणावर कठोर भाष्य करताना सांगितले की, “मराठी माणसाची घुमसट होते… मराठी माणूस अडचणीत आल्यावरच त्याची चर्चा होते, हे दुर्दैव आहे. अभिजात दर्जा मिळून वर्ष झाले तरी मराठी भाषेसाठी काही ठोस झाल्याचे दिसत नाही. सरकारी पातळीवर मराठीचा प्रश्न ‘गुंडाळून’ ठेवला आहे.”


हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलेश पालेकर, रमेश संकपाळ, विलास समेळ, कल्पना देशमुख, श्रीहरी पवळे, राजेंद्र मोरे, मनिषा पाटील, ज्योती माळी, इत्यादींनी अधिक मेहनत घेतली . नारायण लांडगे पाटील आणि शंकर गोपाळे यांनी सुत्रसंचलन केले.



