मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जाहीर केले की, आगामी शैक्षणिक वर्षापासून पीसीएम, पीसीबी आणि एमबीए या अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जाणार आहेत. पहिली परीक्षा एप्रिल २०२६ मध्ये, तर दुसरी परीक्षा मे २०२६ मध्ये होणार आहे.
या निर्णयाबाबत आज मंत्रालयात चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, सीईटी कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
मंत्री पाटील म्हणाले की, राष्ट्रीय स्तरावर जसे जेईईच्या दोन परीक्षा घेतल्या जातात, तसेच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनाही दोन संधी मिळतील. विद्यार्थ्याला एक परीक्षा देणे बंधनकारक असून दुसरी ऐच्छिक असेल. जर विद्यार्थ्याने दोन्ही परीक्षा दिल्या, तर ज्या परीक्षेत जास्त गुण मिळतील ते प्रवेशासाठी ग्राह्य धरले जातील. सीईटी कक्ष लवकरच या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करणार आहे.
