मुंबई : दहीहंडी उत्सवातील थरार, साहस आणि गोविंदांच्या जिद्दीचे दर्शन घडवत बाल गोपाल गोविंदा पथक, कांजूरमार्ग पूर्व यांनी यंदाच्या दहीहंडी उत्सवात ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. २०२६ च्या दहीहंडी उत्सवात या पथकाने तब्बल चार वेळा ९ थरांची मानवी मनोरा रचना यशस्वीपणे साकारत आपल्या शिस्तबद्ध आणि दमदार कामगिरीची छाप उमटवली.
विशेष म्हणजे, विविध ठिकाणी झालेल्या दहीहंडी उत्सवात बाल गोपाल गोविंदा पथकाने ९ थरांची रचना करत सातत्यपूर्ण कामगिरी बजावली. पहिल्या प्रयत्नात मोहन चिराठ, नाहूर, दुसऱ्या प्रयत्नात राधा फाउंडेशन, चेंबूर, तिसऱ्या प्रयत्नात विक्रोली, कन्नमवार नगर येथे ९ थर यशस्वीरीत्या रचण्यात आले. तर चौथ्या वेळी कांजूरमार्ग पूर्व येथे ९ थरांचा मनोरा रचना साकारत पथकाने आपल्या कामगिरीवर कळस चढवला.
या ऐतिहासिक यशामागे पथकातील गोविंदांची अथक मेहनत, नियमित सराव, शिस्त, एकजूट आणि परस्परांवरील विश्वास यांचा मोठा वाटा आहे. पथकाला कोच राजू लाखन बाबू पाटणकर आणि कोच विनोद वांगणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गोविंदांनी सुरक्षितता, समन्वय आणि अचूक संतुलन यांचा योग्य मेळ साधत ९ थरांची रचना यशस्वी केली.
दहीहंडीच्या मैदानावर उपस्थित नागरिकांनी बाल गोपाल गोविंदा पथकाच्या या कामगिरीचे कौतुक करत जल्लोष केला. सलग चार वेळा ९ थर रचण्याची कामगिरी ही पथकाच्या सातत्याचे आणि सामूहिक शक्तीचे प्रतीक ठरली आहे.
ईशान्य मुंबईतील गोविंदा पथकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या बाल गोपाल गोविंदा पथकाचे या अभिमानास्पद कामगिरीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.




