मुंबई : मलबार हिल येथील पुनर्बांधणी करण्यात आलेल्या हायमाऊंट राज्य अतिथीगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. राज्यातील अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, परदेशी शिष्टमंडळे तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या निवासासाठी सुसज्ज अशा या अतिथीगृहामुळे राज्याच्या आदरातिथ्य व्यवस्थेला अधिक बळ मिळणार आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार विश्वजित कदम, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, राजशिष्टाचार, परकीय थेट गुंतवणूक, परदेशस्थ नागरिकांचे विषय आणि संपर्क विभागाचे सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी डॉ. राजेश गवांदे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता प्रज्ञा वाळके यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मलबार हिल परिसरातील या नव्या राज्य अतिथीगृहामध्ये एकूण ५७ सुसज्ज कक्षांची व्यवस्था करण्यात आली असून त्यामध्ये ६ व्हीव्हीआयपी आणि ५१ इतर कक्षांचा समावेश आहे. अतिथीगृहाची रचना तळमजला अधिक आठ मजले अशी असून आधुनिक सुविधा, सुरक्षितता आणि उच्च दर्जाच्या आदरातिथ्य व्यवस्थेचा विचार करून त्याची उभारणी करण्यात आली आहे.
यावेळी मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी अतिथीगृहाची पाहणी करून विविध सुविधांची माहिती घेतली. राज्यात येणाऱ्या देश-विदेशातील मान्यवरांना दर्जेदार निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी हे अतिथीगृह महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.




