आनेवाडी(अजित जगताप) : सातारा जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे सोसायटी मतदारसंघातून मतदार ठराव घेण्यासाठी जिल्ह्यातील अनेक सोसायटीच्या बैठकीत वादावादी व उणीधुणी काढली जात आहेत. जावळी तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या आनेवाडी विकास सेवा सोसायटीत चक्क राजीनामा मागणी व अपहरण नाट्य घडल्यामुळे आनेवाडी परिसरात कसं काय पाटील बर आहे का? आनेवाडी महामार्गावर त्या दिवशी घडलेले खरे आहे का? खुलेआम विचारणा होऊ लागली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जावळी तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या आनेवाडी विकास सेवा सोसायटीच्या मासिक सभेत सातारा जिल्हा बँकेच्या मतदार सभासद ठरावावरून वादावादीची ठिणगी पडली होती. विकास सेवा सोसायटीचे विद्यमान चेअरमन व विकास सेवा सोसायटीचे स्वीकृती सदस्य यांच्यामध्ये तू.. तू.. मै.. मै.. झाली. आनेवाडी विकास सेवा सोसायटीमध्ये गेले काही वर्ष चेअरमन याच्याच नावाने ठराव घेण्याची अघोषित पद्धत होती. त्याला छेद देण्याचे काम होत असल्याने याबाबत हरकत घेतली गेली. त्यातूनच हा वाद वाढीस लागला. यावेळी अनेकांनी बघायची भूमिका घेण्यास पसंत केले होते.
. परप्रांतामध्ये खंडणीसाठी अपहरण केले जाते. परंतु, पुरोगामी सातारा जिल्ह्यातही जिल्हा बँकेच्या ठरावासाठी अपहरणाची चर्चा होत आहे. हीच मोठी खेदजनक गोष्ट आहे. पाटणमध्ये ठराव झालेले मतदार अज्ञात स्थळी पाठवण्यात आले तर कराडमध्ये मालखेड सोसायटीच्या जिल्हा बँकेच्या ठरावावरून कोयत्याने वार झाला आहे. अध्यक्षांनाही मारहाण झाल्याची तक्रार कराड पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. यामध्ये हम भी कुछ कम नही हे दाखवण्यासाठी भाजपचेच जावळी तालुक्यातही अनेक ठिकाणी जिल्हा बँकेच्या मतदार ठरावासाठी कमी जास्त प्रमाणात अनेक प्रकार घडत असल्याने दिनांक पाच ऑगस्टपर्यंत शांतता राखावी. यासाठी आता शेतकरी वर्गच विनंती करू लागलेले आहेत.
आनेवाडी सोसायटीची सभा सुरुवातीलाच वादळी झाली. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नेतृत्व मानणाऱ्या सर्वच संचालकांनी एकमुखी ठराव घेणे अपेक्षित होते. आनेवाडीतील प्रतिष्ठित व मातब्बर सहकार तज्ञांनीच या ठरावाबाबत अपशब्द वापरले. अखेर हा प्रकार थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला. परंतु, काही तडजोडीने हे प्रकार मिटला असला तरी विद्यमान सोसायटी चेअरमनचा राजीनामा आणि जिल्हा बँक ठराव हेच मुळी वादाचे कारण ठरले आहे. राजकारणात दिलेला शब्द न पाळल्यामुळे सहकारात आता एकमेकांची गचुंडी पकडण्यापर्यंत मजल गेली आहे. त्याला आपापल्या परीने इतर जण खतपाणी घालत आहेत. अशी दबक्या आवाजात जावळी तालुक्यात चर्चा आहे.
दरम्यान, याबाबत झालेल्या प्रकाराने आनेवाडी विकास सेवा सोसायटीची परंपरा व एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या तत्त्वाला हरताळ फासला गेला आहे. हे उघड्या डोळ्यांनी पाहून सुद्धा अद्याप काहींशी संपर्क साधूने प्रतिक्रिया दिलेली नाही. उलट या ठरावाबाबत वेळ पडल्यास न्यायालयात धाव घेण्याची ही काहींनी भूमिका घेतल्याचे समजते. आनेवाडी गावात एखादी घटना घडली तर सकाळी सुद्धा भारतभर त्याची माहिती प्रसारित होते. पण, चार दिवस या घटनेबाबत मौन धारण केल्यामुळे अखेर ही गोष्ट उघड्यावर आणण्यासाठीच अनेकांनी प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.
————————————————-
फोटो – आनेवाडी विकास सेवा सोसायटीच्या कार्यालय




