प्रतिनिधी : मुंबईत मराठी भाषेचा आणि मराठी शाळांचा मुद्दा कायमच चर्चेत राहिला आहे. मराठी शाळांवर होणारी गळचेपी थांबवावी तसेच ठरवून बंद पाडल्या जात असलेल्या मराठी शाळा वाचवाव्यात, या मागणीसाठी मराठी अभ्यास केंद्र यांच्या वतीने आज मुंबई महानगरपालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मात्र या मोर्चाला मुंबई पोलिस यांनी परवानगी नाकारली होती.
तरीही मराठी अभ्यास केंद्र आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. सकाळी सुमारे १०.३० वाजता हुतात्मा स्मारक येथे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन करून आंदोलकांनी पालिका मुख्यालयाच्या दिशेने मोर्चा काढला. याआधी रविवारी दादर येथील राजर्षी शाहू सभागृहात ‘ठरवून बंद पाडल्या जाणाऱ्या मराठी शाळांची परिषद’ घेण्यात आली होती. या परिषदेत १८ डिसेंबर रोजी महापालिकेवर मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली होती.
मोर्चासाठी परवानगी मिळावी यासाठी माता रमाबाई आंबेडकर नगर पोलीस ठाणे आणि आझाद मैदान पोलीस ठाणे येथे अर्ज करण्यात आला होता. मात्र भारतीय दंडसंहिता कलम १६८ चा आधार घेत दोन्ही ठिकाणी पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली. परवानगीशिवाय मोर्चा काढल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आदेशाचे पत्र मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार आणि सचिव आनंद भंडारे यांना पाठवण्यात आले होते.
मोर्चाला सर्वपक्षीय राजकीय पक्षांसह विविध शैक्षणिक संस्था आणि संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे. मात्र परवानगी नाकारल्यामुळे मनपा आयुक्तांची भेट होईपर्यंत आंदोलकांनी हुतात्मा चौकातच ठिय्या आंदोलन सुरू केले. या पार्श्वभूमीवर हुतात्मा चौकात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या आंदोलनाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, धर्मराज्य पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यासह महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळ, महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना, मराठी एकीकरण समिती, मुंबई मराठी अध्यापक संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अन्याय निवारण सेवा संघ आदी संघटनांनीही जाहीर पाठिंबा दिला आहे.



