मुंबई : सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉ. शांताराम कारंडे हे एक अष्टपैलू आणि प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहेत. साहित्यिक, लेखक, पत्रकार, उद्योजक, निर्माते व दिग्दर्शक अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. त्यांनी अनेक कविता संग्रह, चारोळी संग्रह तसेच वैचारिक पुस्तके लिहून साहित्य क्षेत्रातही मोलाची भर घातली असून त्यांच्या लेखनाला वाचकांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे.
चर्मकार समाजासाठी त्यांनी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय आहे. समाजातील गरिबातल्या गरीब कुटुंबांना स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने त्यांनी ५० कुटुंबांना उदरनिर्वाहासाठी स्टॉल उपलब्ध करून दिले आहेत. त्यांच्या सामाजिक बांधिलकीची दखल घेत त्यांची राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर ते अनेक सामाजिक व शैक्षणिक संघटनांमध्ये सक्रिय भूमिका बजावत आहेत.
सतत स्मितहास्य, प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणारी वृत्ती आणि समाजासाठी अखंड कार्यरत असलेले नेतृत्व ही त्यांची ओळख आहे. त्यांच्या या बहुआयामी कार्याची दखल घेत धगधगती मुंबई वृत्तपत्राच्या १६व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
हा पुरस्कार सोहळा स्वर्गीय अण्णासाहेब पाटील सभागृह, सेक्टर ४/५, कोपरखैरणे, नवी मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार असून, या घोषणेमुळे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.




