मुंबई : अहमदाबाद येथून मुंबई सेंट्रल येथे येणाऱ्या ‘वंदे भारत’ या सुपरफास्ट वातानुकूलित एक्स्प्रेस मध्ये जी उद्घोषणा करण्यात येते त्यात यापुढे मराठी भाषेवर अन्याय होऊ देणार नाही, मराठी भाषेत सर्वप्रथम उद्घोषणा करण्यात येईल, यासाठी उद्याच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे मागणी करण्यात येईल असे निःसंदिग्ध आश्वासन मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज दिले. मंत्रालयातील पत्रकार कक्षात मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या पत्रकार परिषदेनंतर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री योगेश वसंत त्रिवेदी यांनी उदय सामंत यांची भेट घेतली आणि वंदे भारत सुपरफास्ट वातानुकूलित एक्स्प्रेस मध्ये अहमदाबाद येथून मुंबई सेंट्रल येथे येतांना मराठी भाषा चक्क चौथ्या क्रमांकावर उपयोगात आणली जाते, सर्वप्रथम हिंदी, मग इंग्रजी, नंतर गुजराती आणि सर्वात शेवटी मराठी भाषेत उद्घोषणा करण्यात येते, तत्कालीन रेल्वेच्या राम नाईक यांनी राज्यात राज्यभाषा म्हणजे मराठी भाषेला सर्वात प्रथम मान देणे आवश्यक आहे. असे असतानाही मराठी भाषेवर अन्याय होत आहे ही बाब निदर्शनास आणली. त्यावेळी मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की उद्याच आपण रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्र पाठवून मराठी भाषेवर अन्याय होऊ नये, मराठी भाषेला मानाचे पहिले स्थान दिले पाहिजे अशी भूमिका मांडू.*




