सातारा(अजित जगताप) : काँग्रेस व राष्ट्रवादी आणि इतर मित्र पक्ष विचारधारा जोपासणाऱ्या सातारा जिल्ह्यामध्ये भाजपच्या हिंदुत्ववादी लाटेत अनेक जण काँग्रेस सोडून गेले. पण ज्यांनी भाजप पक्ष वाढवला. त्यावेळेला फटाके वाजवले, पेढे वाटले. आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने त्यांच्यावर रडण्याची वेळ आली आहे. अनेकांना डावल्याने काहींचे पाय आता काँग्रेसकडे वळू लागल्याची चर्चा सुरू झालेली आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये पूर्वी राष्ट्रीय व राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व होते. शिक्षण, सहकार, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रामध्ये घराणेशाहीचा बोलबाला होता. आरक्षण जागेतही घराणेशाहीच्या शिफारशीला महत्त्व प्राप्त झाले होते. या गोष्टीला कंटाळलेल्या युवा पिढीने हिंदुत्ववादी विचारधारा अंगीकारली आणि अत्यंत प्रतिकूल काळामध्ये जनसंघ त्यानंतर भाजप पक्षाचा हिंदुत्ववादी झेंडा ग्रामीण भागात लावण्याची धडपड केली.
सत्तेची कोणतीही ऊब नसताना सुद्धा थंडी सहन करून भाजप पक्ष वाढवला. आज खऱ्या अर्थाने अशा निष्ठावंत भाजपवाल्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उमेदवारी देताना दुजाभाव झाला आहे. हा भाजप निष्ठावंतांवर केलेला अन्याय नसून काँग्रेसच्या हातातच आता भाजपचे सूत्र आली आहेत. त्याला व्यक्तीनिष्ठेची झालर असल्यामुळे तांदळातून खडा बाजूला करतात. अशा पद्धतीने भाजप निष्ठावंतांना दूर साधण्यांमध्ये आता मूळच्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना घवघवीत यश मिळाले आहे. त्यांना अच्छे दिन आले असले तरी मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांना रडण्याची वेळ आलेली आहे.
यामध्ये सातारा जिल्ह्यात भाजप वर्तुळामध्ये दोन नंबरचे भाजप निष्ठावंतांना सुद्धा डावलेले आहे. कराड, पाटण, जावळी महाबळेश्वर फलटण कोरेगाव अशा ठिकाणी तर भाजपच्या विरोधात भाजपचे निष्ठावंत आणि कार्यकर्त्यांचे मतभेद भाजपसाठी कमळाचे काटे ठरलेले आहेत. निवडणुकीत त्याचे पडसाद उमटू लागलेले आहेत. उमेदवारी जावळल्यामुळे दहा ते बारा जणांनी भाजप पक्षाबद्दल सहानभूती आहे पण नेत्यांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान काही नेत्यांना सुद्धा याची झळ पोहचली आहे. भाजप पक्षाचे पदाधिकारी असूनही त्यांना विचारात घेतले नाही असे एका पदाधिकाऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले.
________________________________
फोटो— सातारा जिल्हा भाजप प्रतिकात्मक कार्यक्रमाचा फोटो..




