कराड(प्रताप भणगे) : कराड तालुक्यातील जखिनवाडी येथून बौद्ध लेणीकडे जाणाऱ्या मार्गावरील पाजर तलावात मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने तलावाचे पाणी दूषित होत असल्याचे चिंताजनक चित्र समोर आले आहे. प्लास्टिक, घरगुती कचरा आणि इतर टाकाऊ वस्तूंमुळे तलावाचे सौंदर्यही नष्ट होत असून पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, तलावात सातत्याने कचरा टाकला जात असल्याने दुर्गंधी पसरत असून जलप्रदूषणाची समस्या गंभीर बनली आहे. हा परिसर पर्यटक आणि निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचे ठिकाण असतानाही स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
पर्यावरणप्रेमी आणि ग्रामस्थांनी संबंधित ग्रामपंचायत व प्रशासनाने तातडीने तलावातील कचरा हटवून स्वच्छता मोहीम राबवावी, कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी तसेच परिसरात जनजागृती करावी, अशी मागणी केली आहे. वेळेत उपाययोजना न केल्यास जलप्रदूषणासह पर्यावरणीय समस्यांमध्ये आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.




