
मुंबई (रमेश औताडे) : राज्यातील एक लाख १५ हजार अंगणवाडी केंद्रातील सेविकांना व मदतनीस यांना सरकारने ५ हजार रुपये वाढीव देण्याचे आश्वासन मागील अधिवेशन काळात दिले होते. मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप केली नसल्याने राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस पुन्हा आझाद मैदानात आंदोलन करण्यास उतरल्या आहेत.
अंगणवाडी केंद्रातील मुलांची काळजी घेऊन झाल्यावर त्यानंतर आम्ही आंदोलन करत आहोत. आम्हालाही मुलांची काळजी आहे. मात्र सरकारला या अंगणवाडी बहिणीची काळजी नाही. असा आरोप करत सोमवारी भर उन्हात छत्री घेऊन आंदोलन सुरू केले आहे.
आशा सेविकांना पाच हजार वाढ केली मग आम्हाला का नाही ? १९७२ साली स्थापन झालेल्या अंगणवाडी सेविकांना आपल्या मागण्यासाठी आजही आंदोलन करावे लागत आहे. सरकारची १२ ते १३ प्रकारची समाज उपयोगी करायची, उन वारा पाऊस बाराही महिने सरकारी महिला कर्मचारी प्रमाणे काम करायचे मग वेतनात फरक का ? आता लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरताना जेवण करायला वेळ नाही. त्यामुळे सरकारने आता या धरणे आंदोलनाला न्याय दिला नाही तर यापुढे बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.