मुंबई : शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाची भूमिका, आगामी वाटचाल आणि महायुतीच्या एकजुटीबाबत ठाम भूमिका मांडली. यावेळी त्यांनी खासदारांच्या संभाव्य फुटीच्या चर्चांवर अप्रत्यक्ष भाष्य करत, “पुढे पुढे काय घडतंय ते पाहात राहा,” असे सूचक विधान केले.
एकनाथ शिंदे म्हणाले की, महायुती सरकार लोककल्याणाच्या अजेंड्यावर काम करत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यात मतभेद निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, हे प्रयत्न यशस्वी होणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “आमचा अजेंडा खुर्ची नसून लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणे हा आहे,” असे ते म्हणाले.
अडीच वर्षांच्या कार्यकाळात रखडलेल्या अनेक प्रकल्पांवरील स्थगिती हटवून विकासाला गती दिली असल्याचे सांगताना, महाराष्ट्रातील विकासाची गाडी आता बुलेटच्या वेगाने धावत असल्याचा दावा त्यांनी केला. “मी अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केले, आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून राज्याचा विकास पुढे नेत आहेत,” असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी शिंदे यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेचाही उल्लेख करत, “शेतकरी, कष्टकरी, लाडक्या बहिणी आणि वारकरी सुखी झाले पाहिजेत,” अशी भूमिका मांडली. तसेच, शिवसेनेत वशिलेबाजीला स्थान नसून सामान्य कार्यकर्त्यालाच पुढे आणण्याची पक्षाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.




