मुंबई : मुंबई–पुणे महामार्गावरील तीव्र वाहतूक कोंडीमुळे श्रीलंकेहून भारत दौऱ्यावर आलेल्या भारत अँड स्काऊट गाईड संघटनेच्या ७० विद्यार्थ्यांना पुण्याहून मुंबईकडे येताना मोठा विलंब सहन करावा लागला. परिणामी मुंबईहून कोलंबो येथे जाणारे त्यांचे विमान वेळेत गाठता आले नाही आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली.
या परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर येथील स्काऊट हॉलमध्ये संबंधित ७० स्काऊट गाईड विद्यार्थ्यांची तात्पुरती निवास व्यवस्था करण्यात आली. त्याचबरोबर दादर येथील साने गुरुजी विद्यालयातर्फे या विद्यार्थ्यांसाठी नाश्ता व चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली.
दादरचे सामाजिक कार्यकर्ते आप्पा उर्फ संदीप पाटील यांनी पुढाकार घेत विद्यार्थ्यांना नाश्त्याचे वाटप केले. यावेळी साने गुरुजी विद्यालयाचे विश्वस्त मोहन मोहाडीकर सर तसेच शिवसेना उपशाखाप्रमुख संदीप आप्पा पाटील उपस्थित होते.
अचानक उद्भवलेल्या या संकटाच्या वेळी मुंबईतील स्काऊट गाईड संघटना, शैक्षणिक संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखवलेली तत्परता आणि माणुसकी विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक ठरली.




