ताज्या बातम्या

स्वच्छ सर्वेक्षण २०२५–२६ साठी मुंबई सज्ज; नागरिकांना सहकार्याचे आवाहन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : केंद्र शासनाकडून स्वच्छ सर्वेक्षण २०२५–२६ चा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, यंदा बृहन्मुंबईची कामगिरी अधिक भक्कम असावी, यासाठी नागरिकांनी स्वच्छता राखून महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी केले आहे. स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने सोमवारी (दि. २ फेब्रुवारी २०२६) महानगरपालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या.
यावेळी उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. स्वच्छ सर्वेक्षणाच्या दहाव्या वर्षात शहरातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, नागरिक सहभाग, कचरा वर्गीकरण, संकलन, वाहतूक व प्रक्रिया यांचे मूल्यमापन केले जाणार आहे.
यंदाच्या सर्वेक्षणासाठी ‘स्वच्छता की नई पहल – बढाए हाथ, करे सफाई साथ’ ही मध्यवर्ती संकल्पना असून नागरिकांच्या अभिप्रायाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. संकेतस्थळ व अ‍ॅपच्या माध्यमातून वर्षभर डिजिटल अभिप्राय संकलित केला जाणार आहे. उघड्यावर शौच व लघवी रोखण्यासाठी नवीन मानके, शाळांमधील वर्तनबदल कार्यक्रम, तसेच किनारपट्टी शहरांसाठी स्वतंत्र निकष लागू करण्यात आले आहेत.
घनकचरा, मलनिस्सारण, पर्जन्यजल, सांडपाणी विल्हेवाट व शिक्षण विभागांनी परस्पर समन्वयातून प्रभावी उपाययोजना राबवाव्यात व अचूक, अद्ययावत माहिती संकलित करावी, असे निर्देश डॉ. जोशी यांनी दिले. स्वच्छतेला प्राधान्य देऊन नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असेही त्यांनी आवाहन केले.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top