महाबळेश्वर : सध्याच्या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबाबत तीव्र चिंता व्यक्त करत भजनसम्राट कोयना रत्न राजाराम बुवा शेलार यांनी १०५ गावांच्या समस्त समाज बांधवांना नम्र पण ठाम शब्दांत संदेश दिला आहे. नको त्या मार्गाने मिळवलेला पैसा समाजात उधळला जात असून तो स्वीकारताना आपण नकळत पापाचे भागीदार बनतो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. असे धन क्षणिक लाभ देत असले तरी त्याचे ओझे आयुष्यभर मनावर राहते, ही कटू वस्तुस्थिती असल्याचेही त्यांनी नमूद केले.
१०५ गावांचा समाज कोणाच्या दयेवर उभा नाही, हा आपला गौरवशाली इतिहास असून “१०५ म्हणजे ग्यानबाची ज्ञानबा मॅक” असे अभिमानाने म्हटले जाते, असे सांगत त्यांनी समाजाच्या स्वाभिमानावर आणि प्रामाणिक कष्टावर भर दिला. हा समाज स्वतःच्या श्रमावर उभा असून तो तसाच टिकून राहिला पाहिजे, हीच आपली अंतःकरणातून अपेक्षा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आपल्या परिसराच्या शाश्वत विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मकरंद आबा पाटील, संजूबाबा गायकवाड तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी कायम लोकांच्या सुख-दुःखात सहभाग घेतला. रस्ते, पाणी, वीज, दळणवळण यांसारख्या मूलभूत गरजांसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले, असेही त्यांनी सांगितले.
महाबळेश्वर तालुक्याचे भाग्यविधाते, कैलासवासी बाळासाहेब दादा भिलारे यांनी कोयना, कांदाटी–सोळशी दऱ्या खोऱ्यासाठी दूरदृष्टीपूर्ण विकास आराखडा तयार केला होता. आज सुरू असलेली विकासकामे ही त्याच आराखड्याची पुढची पावले असून नव्याने काही घडते आहे असे चित्र नसल्याचे मत राजाराम बुवांनी व्यक्त केले.
स्वर्गीय अजितदादा पवार यांना खरी श्रद्धांजली द्यायची असेल, तर ती केवळ शब्दांत नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून देऊन त्यांच्या विचारांना पुढे नेण्यातच आहे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. समाजाने शांतपणे, विवेकाने आणि भवितव्याचा विचार करून निर्णय घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.




