प्रतिनिधी : महाबळेश्वर पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने नवी मुंबई येथे १२ गाव समाजाचा भव्य कार्यकर्ता व संपर्क मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्याला सातारा जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख सौ. रेश्मा जगताप यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या मेळाव्यात १२ गाव समाजातील धडाडीचे कार्यकर्ते तसेच तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र झटणारे स्वर्गीय धोंडीराम बापू जाधव (बापू) यांचे चिरंजीव श्री. संपत भाऊ जाधव, श्री. संतोष जाधव आणि शिवसेनेच्या अधिकृत पंचायत समिती उमेदवार सौ. वैशालीताई संतोष जाधव यांची उपस्थिती विशेष ठरली.
मेळाव्यादरम्यान बारागाव समाजातील बहुसंख्य समाजबांधवांनी एकमताने शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार सौ. वैशालीताई संतोष जाधव यांना जाहीर पाठिंबा देत, “पक्ष आणि चिन्हापेक्षा आपला माणूस महत्त्वाचा” असा ठाम निर्धार व्यक्त केला. आपल्या मतातून विकास साधण्याचा संकल्प उपस्थित समाजबांधवांनी केला.
यावेळी १२ गाव समाजाचे उपाध्यक्ष श्री. राजाराम धारू सकपाळ घावरी, राजेंद्र घाडगे पाटील (शिवसेना तालुकाप्रमुख, महाबळेश्वर), रमेश गणपत सकपाळ (शिवसेना शाखाप्रमुख, गोरेगाव), निलेश आगुंडे, सतीश मोरे येरणे, तानाजी लक्ष्मण सकपाळ घावरी, प्रकाश किसन सकपाळ घावरी, नितीन घाडगे येरणे आदी मान्यवरांनी मेळाव्यास मार्गदर्शन केले.
समाजबांधवांचा मोलाचा सल्ला आणि पाठिंबा ऐकून श्री. संतोष आप्पा जाधव भावुक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. “हा पाठिंबा केवळ निवडणुकीपुरता नसून आपल्या समाजाच्या भविष्यासाठीचा विश्वास आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते तानाजी सकपाळ यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “१२ गाव समाजाने घेतलेला निर्णय हा मुंबईकरांसाठी अंतिम निर्णय ठरेल. मुंबईतील मंडळे जरी गावचा कारभार पाहत असली, तरी शेवटी समाज महत्त्वाचा आहे. समाज एकत्र राहिला तरच समाजाचा विकास होईल. काही लोक विकासाच्या नावाखाली दिलेल्या निधीचा गाजावाजा करतात, मात्र तो निधी वैयक्तिक नसून शासनाचा असतो, हे जनतेने लक्षात घ्यावे. त्यामुळे आपल्या समाजातील व्यक्तीला पुढे आणणे हीच खरी समाजसेवा आहे.”
यावेळी मुंबईतील सर्व १२ गावच्या रहिवाशांनी गावी जाऊन आपल्या समाजातील उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले. शिवसेनेच्या धनुष्यबाण या अधिकृत चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला विजयी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या मेळाव्यास समाजबांधव श्री. मारुती पवार मालुसरे, दिपक मोरे येरणे, रामचंद्र गायकवाड आचली, आनंदा मोरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळकृष्ण भगवान सकपाळ घावरी यांनी केले.
मेळाव्याच्या शेवटी उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. हा संपर्क मेळावा आगामी पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.




