मुंबई : मुंबई येथून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणाऱ्या कोकणवासीयांसाठी सागरी प्रवासी जलवाहतूक मार्गास मान्यता देण्यात आली आहे . मुंबईपासून या मार्गावर प्रवासी सागरी जलवाहतूक प्रथमच सुरू होत असून हे क्रांतिकारी पाऊल ठरणार आहे, असे प्रतिपादन मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले.
माझगाव भाऊचा धक्का येथे एम टू एम प्रिन्सेस या रोरो कंपनीची प्रवासी वाहतूक सेवेसाठी पूर्वतयारीची पाहणी बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केली.
मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे म्हणाले “सागरी जलमार्गाद्वारे रत्नागिरी जिल्ह्यात जाण्यासाठी तीन तास व सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाण्यासाठी पाच ते सहा तास इतका अवधी लागणार असून कोकणवासीयांच्या प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. या वाहतुकीला केंद्र व राज्य सरकारच्या विविध परवानग्या प्राप्त करूनच मान्यता दिली जाते. येथून पुढे या मार्गावर सागरी प्रवासी जलवाहतुकीसाठी अजून वाहतूक कंपन्या पुढे येत आहेत.”
यावेळी त्यांनी एम टू एम प्रिन्सेस या प्रवासी बोटीची फिरून पाहणी केली.
आवश्यक पूर्व तयारी झाली असली तरी सागरी वाहतुकीसाठी समुद्री वातावरण या बाबी तपासून ‘ एम टू एम प्रिन्सेस‘ कंपनीची रोरो प्रवासी जलवाहतूक सुरू होणार आहे. अशी माहिती जलवाहतूक सेवाकंपनीच्या वतीने यावेळी देण्यात आली.