मुंबई-बुधवार-प्रतिनिधी -हरिजन सेवक संघ” या संस्थेचे नाव तात्काळ बदलण्यात यावे, जेणेकरून कोणत्याही घटकाच्या आत्मसन्मानावर आघात होणार नाही,
जर हे शक्य नसेल, तर सदर संस्था विसर्जित करण्यात यावी, कारण आजच्या संविधानिक मूल्यांशी ते सुसंगत नाही, अशी विनंती कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पत्राद्वारे रयत विद्यार्थी मंचातर्फे करण्यात आली आहे.
मंचाचे संतोष शिंदे आपल्या पत्रात म्हणतात,
आजच्या काळात “हरिजन” ही संज्ञा कोणत्याही संवैधानिक दस्तावेजात वापरली जात नाही, कारण ती शोषित घटकांना ‘दया दाखवण्याच्या’ भूमिकेत ठेवते, जे स्वतः महात्मा फुलेंपासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारले होते. 2012 मध्ये राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने स्पष्ट आदेश दिले की, “हरिजन” या संज्ञांचा वापर थांबवावा व त्याऐवजी “अनुसूचित जाती/जमाती” या घटनात्मक संज्ञा वापराव्यात. भारत सरकारनेही शासकीय पत्रव्यवहारात या शब्दांवर बंदी घातली आहे.
या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रात “हरिजन सेवक संघ” या संस्थेच्या अध्यक्षपदी नुकतीच झालेली नेमणूक अत्यंत दुःखद आणि विरोधाभासी वाटली. एकीकडे आपण संविधान हातात घेऊन समतेचा संदेश देत असताना, दुसरीकडे आपल्या नेतृत्वाखालील संस्थांमधून अजूनही असा अपमानजनक शब्दप्रयोग सुरू आहे, ही अतिशय खेदाची बाब आहे.
आपण आधुनिक विचारांचे आणि तरुण नेतृत्वाचे प्रतीक आहात, आणि मा. मल्लिकार्जुन खरगे हे दीर्घ अनुभवाचे आणि संविधानिक जाण असलेले नेतृत्व आहे,
म.गांधीजींच्या नावावर चालणाऱ्या संस्थेत, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेल्या संज्ञांचा वापर सुरू ठेवणे, ही केवळ सांस्कृतिक विसंगती नाही, तर तो संविधानाचा अवमान ठरेल याकडे राहुल गांधी आणि खरगे यांचे शिंदे यांनी सदर पत्रातून लक्ष वेधले आहे.