कराड : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील विंग ते कोळेवाडी दरम्यान रस्त्यालगत करण्यात आलेल्या वृक्षलागवडीची दयनीय अवस्था समोर आली आहे. पाहणीत सुमारे १० ते २० टक्के झाडे मृत झाल्याचे आढळून आले असून, वृक्षसंवर्धनाकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसत आहे.
विशेष म्हणजे सध्या पावसाळा सुरू असतानाही अनेक झाडे वाळल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “पावसाळ्यातच झाडांची ही अवस्था असेल, तर उन्हाळ्यात त्यांच्या संगोपनाचे काय होणार?” असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
पर्यावरण संवर्धनासाठी लावण्यात आलेल्या झाडांची नियमित देखभाल, पाणी, संरक्षण आणि निगा राखण्यात संबंधित यंत्रणा कमी पडल्याचा आरोप होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने मृत झाडांच्या जागी नवीन रोपे लावून उर्वरित झाडांच्या संरक्षणासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.




