स
ातारा(अजित जगताप ) : छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता आहे. या राजाच्या शिवजयंती निमित्त सातारा जिल्ह्यात खऱ्या अर्थाने बहुजन मावळ्यांच्या प्रयत्नाने शिवशाही अवतरली. छत्रपतींची राजधानी विद्युत रोषणाई व मसाल्याने न्हाऊन निघाली.
सातारा येथील किल्ले अजिंक्यतारा किल्ल्यावर मशाल महोत्सव आणि तेवढ्याच ताकतीने राजवाडा परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यातील विविध प्रसंगाच्या छायाचित्राचे प्रदर्शन आणि मावळ्यांचा अलोट उत्साह यामुळे मराठा साम्राज्याच्या पाऊलखुणा दिसून येत होत्या. सातारा ही छत्रपतींची राजधानी असल्यामुळे जय भवानी… जय शिवाजीचा… जयघोष आणि नारा प्रत्येक घरोघरी ऐकू येत होता. सर्व जाती धर्मातील मावळ्यांनी शिवजयंती साजरी करून खऱ्या अर्थाने या राजाला मानाचा मुजरा केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सातारा शहरातील पोवई नाका येथील शिवतीर्थावर छत्रपतींच्या पुतळ्याने पुष्पहार अर्पण करून त्यांना मानाचा मुजरा करण्यातच स्वतःला धन्य झाल्याचे समजत होते. प्रत्येक घरातील छत्रपती शिवरायांच्या प्रतिभा व मूर्तीला अनेकांनी पुष्पहार अर्पण करून या राजाच्या सर्वधर्मसमभावाच्या कारकिर्दीची उजळणी केली. शासकीय पातळीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सातारचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जय शिवाजी… जय भारत.. पदयात्रेचे चांगल्या पद्धतीने आयोजन केले. यामध्ये अधिकारी कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधींचा सहभाग दिसून आला. अनेकांनी आपापल्या राज्याचे स्मरण करून प्रतापगड ,रायगड, शिवनेरी, अजिंक्यतारा व इतर किल्ल्यावरून शिवज्योत आणली आणि त्याचे भव्य दिव्य स्वागत केले .तसेच पूजनही करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज की जय घोष सर्वत्र आज दिवसभर दिसून येत होता. घरातील बाल मावळ्यांनी छत्रपतींना वंदन करताना छत्रपतींच्या तसबीरेचे अंगरखे घालून या शिवजयंतीला आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले होते. प्रतापगड म्हणजे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या उभारणीसाठी केलेला पराक्रमच आहे. या पराक्रमाची आठवण करताना एका बाजूला प्रतापगड विकास प्राधिकरण च्या माध्यमातून सुमारे २०० कोटी रुपयांच्या कामांची सुरुवात झाली आहे. अत्यंत देखणे व उत्कृष्टरित्या शिव गाथा जगभर पसरवण्यासाठी कारागीर परिश्रम घेत आहेत. किल्ल्याच्या आठ हेक्टर आणि ६४ फूट परिसराचे संरक्षण निश्चित झालेले आहे. या गडावर ऐतिहासिक वस्तू संग्रहालय ,प्रेक्षक गॅलरी, वस्तू विक्रीचे दालन ,लँड स्नॅपिंग वर्क, सीसीटीव्ही यंत्रणा व अफजल खान कबर परिसरात शिवप्रतापाचे विद्युत थीम उभारण्यात येणार आहे.
प्रतापगडावर वाईतील सुभेदार अफजलखानाने स्वराज्य वर घाव घालण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांवर हल्ला करण्याचे स्वप्न पाहिले होते. परंतु छत्रपतींच्या वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा जसा बाहेर काढला तसाच छत्रपतींच्या पराक्रमी तलवारीने स्वराज्याची गद्दारी करणाऱ्या अफजल खानाचे वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांनाही यम सदनी पाठवले. या दोन्ही इतिहासाची आठवण अनेक शिवशाहीर यांनी करून दिली.
आज संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवजयंती निमित्त आनंदाचा व परंपरा जिवंत ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करणाऱ्या मावळ्यांनी कोणतीही कसूर ठेवली नव्हती. आज अनेक मान्यवरांनी छत्रपती शिवरायांना अभिवादन करून हे रयतेचे राज्य पुन्हा निर्माण व्हावे. अशी मनोभावे प्रार्थना केली. यानिमित्त पोवाडा व इतर स्पर्धा तसेच महाआरती आणि महत्त्वाचे म्हणजे शिवकालीन वेशभूषा प्रदान करून सहभागी झालेले मावळे यामुळे दरवर्षी शिवजयंतीची शिवगाथा उन्हाळ्याच्या पूर्वसंध्येला चांगलाच गारवा निर्माण करत असल्याची दिसून येत आहे.
………………………………
फोटो सातारा जिल्ह्यात छत्रपती शिवरायांना अभिवादन करताना बालमा वळा व मान्यवर (छाया- निनाद जगताप, सातारा)