मुंबई(रमेश औताडे) : जयभीम नगर, पवई येथे महापालिकेच्या निष्काळजी कारवाईच्या विरोधात युवा भीमसेना महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने अध्यक्ष विलास माने यांच्या नेतृत्वाखाली मुंबई मराठी पत्रकार संघात सोमवारी पत्रकार परिषद घेण्यात आली.
दिनांक ६ जून २०२४ रोजी एस विभाग पोलिसांच्या मदतीने महानगरपालिकेने जयभीम नगरातील झोपड्यांवर बुलडोझर चालवत कारवाई केली. मात्र, या कारवाईसाठी मानवी हक्क आयोगाचे कोणतेही आदेश नव्हते, असा आरोप माने यांनी केला.
यासंदर्भात रहिवाशांनी न्यायालयात धाव घेतली असता कोर्टाने एसआयटी गठीत केली. या समितीचे प्रमुख मा. शशीकुमार मीना यांनी अहवाल सादर करत महापालिकेकडे कोणताही अधिकृत आदेश नव्हता, असे स्पष्ट केले.
तथापि, एसआयटीच्या अहवालावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसून, या अन्यायाविरोधात युवा भीमसेना येत्या ७-८ दिवसांत मंत्रालयावर घेराव आंदोलन करणार असल्याची माहिती विलास माने यांनी दिली. तसेच, एसआयटीच्या कार्यपद्धतीविरोधात लवकरच न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.