मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन वास्तूचा प्रकल्प वांद्रे शासकीय वसाहतीत उभारला जात आहे. या प्रकल्पाला कुठलाही विरोध नाही. मात्र, गेल्या ५० वर्षांपासून येथे राहणाऱ्या रहिवाशांवर आणि व्यावसायिकांवर अन्याय करु नका. स्थानिकांचे पुनर्वसन वसाहतीतच किंवा जवळच्या परिसरातच करावे आणि या मागणीवर निर्णय होईपर्यंत PAP सदनिकांची वाटप प्रक्रिया आणि सोडत कार्यक्रमाला स्थगिती द्यावी अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
यासंदर्भात खासदार वर्षा गायकवाड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना पत्र पाठवले असून या पत्रात पुढे असे म्हटले आहे की, मागील आठवड्यात, या विषयावर प्रकल्पबाधित नागरिक आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. स्थानिकांच्या मागण्यांना न्याय मिळावा, ही आमची ठाम भूमिका आहे. आज, माझ्या कार्यालयाने या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या गौतम समता सेवा संघ सहकारी गृहनिर्माण संस्थेला भेट दिली. यावेळी स्थानिक रहिवाशांनी आपल्या समस्या मांडल्या आणि त्यांचे पुनर्वसन वसाहतीतच किंवा आसपासच्या परिसरात व्हावे, ही रास्त मागणी केली आहे.
पूर्वी येथे SRA प्रकल्प प्रस्तावित होता, ज्याअंतर्गत रहिवाशांना त्याच ठिकाणी ३०५ चौरस फुट क्षेत्रफळाच्या पुनर्वसन घरांची हमी देण्यात आली होती. आता मात्र त्यांना प्रकल्पबाधित (PAP) म्हणून वांद्र्यापासून दूर मालाड-मालवणी येथे फक्त २२५ चौरस फुट क्षेत्रफळाच्या सदनिका देण्याची योजना आहे. नागरिकांनी या सदनिकांची पाहणी केली असता त्या अत्यंत दयनीय अवस्थेत असल्याचे खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.