मुंबई : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आपल्या त्यागमयी योगदानाने इतिहास रचणारा गिरणी कामगार घराच्या प्रश्नावर मुंबई पासून हद्दपार होता कामा नये,अशी ग्वाही राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांनी येथे ध्वजरोहण प्रसंगी गिरणी कामगारांपुढे बोलताना दिली.
राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या वतीने परेलच्या मजदूर मंझील मधील प्रांगणात, देशाच्या ७६ व्या प्रजासत्ताकदिनी अध्यक्ष सचिन अहिर यांच्या हस्ते ध्वजारोहण
पार पडले.त्यावेळी गिरणी कामगारांपुढे बोलताना आमदार सचिन आहिर पुढे म्हणाले, गिरणी कामगारांच्या रखडलेल्या घरांच्या तसेच गिरण्यांच्या चाळीच्या पुनर्विकासाच्या प्रश्नावर आपण अलिकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टमंडळाद्वारे भेट घेतली आहे. त्यांनी या प्रश्नावर लवकरच संबंधिता समवेत बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे,असे सांगून श्री अहिर म्हणाले,कोविडचे कारण पुढे करून मुंबईसह राज्यातील एनटीसीच्या गिरण्या गेल्या पाच वर्षांपासून बंद आहेत.केंद्र सरकारकडून या गिरण्या पुर्ववत चालविल्या जात नाहीत किंवा गेल्या काही महिन्यांपासून कामगारांना पगारही देण्यात आलेला नाही.तेव्हा स्वातंत्र्य लढ्यातील गिरणी कामगारांच्या योगदानाचा सरकारला विसर पडला समजायचा का? या प्रश्नावर खासदारां समवेत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्याची भेट घेण्यात येणार आहे.
स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती दणा-या शूर विरांच्या आत्मबलीदा नातून,तसेच महात्मा गांधी,जवाहरलाल नेहरू,मौलाना आझाद यांच्या सारख्या अनेक देशभक्तांच्या लढ्यातून देशाला स्वातंत्र्य मिळाले,हा खरा स्वतंत्र लढ्याचा जाज्वल्य इतिहास आहे.परंतु काही तथाकथित चित्रपट कलाकार,देशाला गेल्या दहा वर्षांपासून ख-या अर्थाने स्वतंत्र्य मिळाले,अशी मुक्ताफळे उधळत आहेत.स्वातंत्र्यानंतर ज्या देशात सुई बनत नव्हती त्या देशाने अंतराळ संशोधनात बाजी मारली,अन्न-धान्यात मजल मारली,असे अनेक अंगाने देशाला मिळवून देण्यात आलेले बहुआयामी यश कदापि विसरता येणार नाही.
स्वातंत्र्याबरोबरच थोर घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला जे संविधान दिले,त्यामुळेच देश आज एकसंघ राहिला आहे. तेव्हा प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने भारताचे संविधान सुरक्षित ठेवण्याचा संकल्प आपल्याला करावा लागेल.देशाने आपल्याला काय दिले या पेक्षा,आपण देशाला काय देणार ?याची तयारी आता सर्वांना ठेवावी लागेल,असेही सचिन अहिर यांनी आपल्या भाषणात आवाहन केले.त्या प्रसंगी सरचिटणीस गोविंदराव मोहिते आणि अन्य पदाधिका री उपस्थित होते.संघटनेच्या सेवादल विभागाने ध्वज संचलनात महत्वाचे सहकार्य केले.
स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणारा गिरणी कामगार मुंबईच्या हद्दपार होता कामा नये! सचिन अहिर यांचे ध्वजरोहण प्रसंगी प्रतिपादन
RELATED ARTICLES