सातारा (अजित जगताप) : जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या सातारा जिल्ह्यातील कास पठार म्हणजे निसर्गाचे वरदान आहे. परंतु अद्यापही क्षमतेप्रमाणे फुल उमलली नसल्याने मार्केटिंग फंडा पाहून कास पठाराला येणाऱ्या पर्यटकांची निराशा झाली. फुलं उमलली नसल्याने पर्यटकांचा एप्रिल फुल झाल्याची चर्चा सुरू झालेली आहे.
दरवर्षी पावसाळ्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मोकळ्या मैदानात मोठ्या प्रमाणात फुलं उमलत होती. कोणत्याही प्रकारचे कंपाउंड नसल्याने जिकडे नजर जाईल तिकडे फुले दिसत होती. आता कंपाऊंडमुळे तुरळ ठिकाणी फुलं उमललेली दिसत आहे. हंगाम सुरू झाल्यामुळे कास पठारावर चवर, तेरडा, सीतेचे आसवे, गेंद, नभाळी, आभाळी आणि कंदील पुष्प यांची काही रूपे दृष्टीस पडत आहेत.
सातारा जिल्ह्यातील कास पठार नव्हे तर महाबळेश्वर, पाटण, वाई, कराड तालुक्यातील ग्रामीण भागातही अशी डोंगर माथ्यावर फुलं येतात. कास पठारावर दीड दिवस आयुष्य असणारी फुलं उमलण्यासाठी ऑक्टोबर महिन्याची वाट पाहावी लागते. आगामी काही दिवसांत पावसाचे प्रमाण आणि वातावरणानुसार फुलांची रंगीबेरंगी चादर पाहण्यासाठी किमान पंधरा दिवस आणखीन पर्यटकांना वाट पाहावी लागणार आहे. त्यावेळी गर्दी नियंत्रणासाठी प्रवेश शुल्क ₹२०० प्रति व्यक्ती आकारणी संयुक्तिक ठरणार आहे. यामध्ये पार्किंग व बस सेवा असली तरी पर्यावरणाच्या रक्षणासाठी दररोज फक्त तीन हजार पर्यटकांना प्रवेश दिला जाणार आहे. प्रत्येकी दोनशे रुपये शुल्क आकारणी करणार आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात गेल्या पंचवीस वर्षात प्रत्येक दिवशी कास पठारावर पर्यटक आले नाहीत. हे आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे.
फक्त मार्केटिंग फंडा म्हणून आकडेवारी वाढवून पर्यटकांना आकर्षित केले जात आहे. यातून काहींचा व्यवसाय अवलंबून आहे. असा आरोप होत आहे. याला दुजोरा म्हणजे या कास पठार बाबत चालणारे भ्रष्टाचाराविरोधात उच्च न्यायालयात सामाजिक कार्यकर्ते संजय गाडे यांनी दोन लाख रुपये भरून याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनावणी मध्ये उच्च न्यायालयात याचिकाकर्त्याचे म्हणणे मांडताना बऱ्याच गोष्टी फुलांसारख्या पर्यटकांच्या दृष्टीस पडणार आहेत.
कास पठार फुलांचा हंगाम खऱ्या अर्थाने १० सप्टेंबर२०२६ पासून सुरू करणे म्हणजे पर्यटकांना थोडी तरी फुले मनसोक्त पाहण्यास मिळाली असती. १ सप्टेंबर पासून कोणत्या मुहूर्तावर फुले पाहण्यासाठी वन विभागाने व स्थानिक कास पठार समितीने सुरुवात केली आहे. याचं कुठलंही वैज्ञानिक हिशोब लागत नाही. सध्या फुलांचा बहर कमी आहे. हे मान्य करण्याचे सौजन्य वन विभागाने दाखवले आहे. हा त्यांचा मनाचा मोठेपणा आहे. त्याबाबत जनजागृती करण्यासाठी सोमवार दिनांक १ सप्टेंबर रोजी कास पठारला भेट दिलेले अनेक पर्यटक आता वस्तुस्थिती मांडून घाई गडबडीत येणाऱ्या पर्यटकांचे आर्थिक नुकसान होऊ नये. याची काळजी घेणार आहे.
कास पठारावर तुरळक फुले व तुरळक पर्यटक आणि काही व्यवसायिक बिदागी बहादुर गुच्छ यांची गर्दी केली होती. त्यांनी उपस्थित पर्यटकांच्या चेहऱ्यावरील नाराजी बघितली नाही.कास पठारावर मोठ्या प्रमाणात डोळ्याची पारणे फेडणारी हिरवळ आणि फुलांचे छोटे-छोटे बाल समूह पाहायला मिळतात. तेरडा, चवर आणि सीतेचे आसवे ही फुल साधारण १५ सप्टेंबरनंतर बहरतात. संपूर्ण पठारावर फुलांचे रंगीबेरंगी चादर पाहून निसर्गाचे नक्षीकाम लोकांना भुरळ पाडतात. गुलाबी, जांभळ्या आणि पिवळ्या रंगांची फुले या काळात संपूर्ण पठार व्यापून टाकतात. यासाठी पर्यटकांनी जुने व्हिडिओ व फोटो यावर विश्वास न दाखवता. ज्या पर्यटकांनी त्या ठिकाणी भेट दिलेले आहे. त्यांच्याशी संवाद साधावा. अशा पर्यटकांनी जनजागृतीसाठी वस्तुस्थिती लोकांपर्यंत पोहोचवावी. अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते व हौशी पर्यटक गुलाबराव बनसोडे, महारुद्र तिकुंडे, चंद्रकांत पाटील, वीरेंद्र शहा, रुस्तम परदेशी, जमीर पठाण व पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कोल्हापूर या ठिकाणी कास पठारावर भेट दिलेल्या काही पर्यटकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान मार्केटिंग फंडा मुळेच जनहित याचिका दाखल करण्याची वेळ आली आहे. असे स्पष्ट याचिकाकर्ते संजय गाडे यांनी प्रसारमाशी बोलताना सांगितले आहे. त्यांच्या याचिकेबाबत राष्ट्रीय पातळीवरील माध्यमांनी दखल घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.




