मुंबई(रमेश औताडे) : पोटभर अन्न आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण या दोन मूलभूत गरजा पूर्ण झाल्या तरच देशाचे भविष्य घडते. याच विचारातून मलाबार ग्रुपने राबविलेल्या ” हंगर फ्री वर्ल्ड ” उपक्रमाला मुंबईतील कांदिवली पूर्व येथील अटल बिहारी वाजपेयी कौशल्य विकास केंद्रात नवी दिशा मिळाली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. सन २०२६-२७ साठी तब्बल २०० कोटी रुपयांच्या सीएसआर निधीची घोषणा करण्यात आली आहे
आजही अनेक विद्यार्थी आणि युवक उपाशीपोटी शिक्षण घेत आहेत. अशा परिस्थितीत ‘हंगर फ्री वर्ल्ड’ उपक्रम त्यांच्या आयुष्यात आशेचा किरण ठरत आहे. भारतासह विविध आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये हा उपक्रम दररोज एक लाखाहून अधिक गरजू लोकांपर्यंत जेवण पोहोचवत आहे.
यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले, “युवकांना सक्षम बनविण्यासाठी कौशल्य विकास अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र शिक्षण आणि कौशल्य विकासाचा पाया हा पोषणावर आधारित असतो. विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या तर ते शिक्षण आणि स्वतःच्या विकासावर अधिक लक्ष केंद्रित करू शकतात.”
मलाबार ग्रुपचे अध्यक्ष एम. पी. अहमद यांनीही पोषण आणि शिक्षण यांच्यातील अतूट नात्यावर भर दिला. “भूक आणि शिक्षण एकत्र नांदू शकत नाहीत. दर्जेदार शिक्षणासाठी पुरेसे पोषण आवश्यक आहे. ‘हंगर फ्री वर्ल्ड’च्या माध्यमातून आम्ही ही मूलभूत गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहोत,” असे त्यांनी सांगितले.
अटल बिहारी वाजपेयी कौशल्य विकास केंद्र हे युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणारे केंद्र ठरत आहे. येथे व्यावसायिक प्रशिक्षण, प्रमाणपत्र अभ्यासक्रम, करिअर मार्गदर्शन आणि रोजगार सहाय्य उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे युवकांची रोजगारक्षमता वाढून त्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनण्यास मदत होत आहे.
भूकमुक्त समाज आणि कौशल्यसंपन्न भारत या दुहेरी उद्दिष्टांकडे वाटचाल करणारा हा उपक्रम केवळ अन्नदानाचा कार्यक्रम नसून हजारो युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उभारलेला आशेचा सेतू असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.




