ताज्या बातम्या

विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे सर्व 17 उमेदवार विजयी होतील – रविंद्र चव्हाण…. महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची यादी केली जाहीर

मुंबई :


विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व 17 अधिकृत उमेदवार विजयी होतील, असा ठाम विश्वास भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी बुधवारी व्यक्त केला. महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी श्री.चव्हाण यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी या महायुतीच्या घटक पक्षांतर्फे घेण्यात आलेल्या या संयुक्त पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, शिवसेना नेते राहुल शेवाळे, भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार उत्तम प्रकारे काम करत असताना राज्यात महायुतीचे सरकार देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदशनाखाली घोडदौड करत आहे. शेतकरी, कष्टकरी या वर्गाच्या हिताचे निर्णय धडाक्याने घेतले जात आहेत. त्यामुळे 18 जून रोजी होणारी विधान परिषदेची निवडणूक महायुतीतर्फेच लढण्याचा निर्णय घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी या जागांबाबत एकत्र बसून चर्चा केली आणि जागांचे वाटपही केले. या नेत्यांनी जाहीर केलेल्या अधिकृत उमेदवारांना निवडून देण्याच्या सूचना महायुतीच्या संबंधित मतदारांना देण्यात आल्याचे श्री. चव्हाण यांनी सांगितले.

या निवडणुकीत अनेक वर्षे काम करणाऱ्या काही कार्यकर्त्यांनीही उमेदवारी अर्ज भरले आहेत. बंडखोरी करत कुणी अर्ज भरले असतील त्यांनी वरिष्ठांशी बोलून आपले अर्ज मागे घ्यावेत. त्यांच्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचा निर्णय कालच्या बैठकीत झाल्याचे श्री. चव्हाण म्हणाले.

यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे म्हणाले, महायुतीतर्फे समन्वय साधत सर्वांना सामावून घेण्याची भूमिका घेण्यात आली आहे. महायुतीच्या 17 अधिकृत उमेदवारांना पहिल्या पसंतीचे मत देण्याचे आवाहन त्यांनी संबंधित महापालिकांचे नगरसेवक, पंचायत समितीचे सभापती आणि नगर पंचायतीच्या नगरसेवकांना केले. उद्या उमेदवारी मागे घेण्याचा अखेरचा दिवस असल्याने त्यानंतर महायुतीचे केवळ अधिकृत उमेदवार रिंगणात राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ज्या कार्यकर्त्यांनी अर्ज भरले आहेत त्यांच्याशी एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली असून त्यांच्या कार्याचा सन्मान केला जाईल. त्यामुळे महायुतीचेच सर्व उमेदवार निवडून येतील, असे राहुल शेवाळे यांनी ठामपणे सांगितले.

Scroll to Top