सातारा(अजित जगताप) : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सातारा जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद इतिहासात क्रांती झाली आहे. सातारा भाजप जि.प. अध्यक्ष डॉ. प्रियाताई महेश शिंदे यांनी स्वीय सहाय्यक पदासाठी महिला पर्यवेक्षक वृंदा शिवदे यांची निवड करून खऱ्या अर्थाने नारी शक्तीचा गौरव केला आहे. याबद्दल अनेक मान्यवरांनी त्यांचे मनापासून कौतुक केले आहे.
महाराष्ट्र शासनाने १ मे १९६२ रोजी महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या
अधिनियम १९६१ चा कायदा सहमत केला व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद, गट पातळीवर पंचायत समिती व गाव पातळीवर ग्रामपंचायत अशा रितीने त्रिस्तरीय पंचायत
राजची स्थापना केली. स्व. यशवंतरावजी चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली मे १९६२ मध्ये सातारा जिल्हा परिषदेची स्थापना झाली. कराड तालुक्याचे सुपुत्र स्व.आबासाहेब पार्लेकर सातारा जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष होते. आज रोजी ११ पंचायत समिती
आणि १४९५ ग्रामपंचायती ग्रामीण भागांच्या विकासासाठी कार्यरत आहेत. ७३ व्या घटना दुरुस्तीद्वारे महिलांना सत्तेत सहभाग दिलेला असून ग्रामसभाद्वारे ग्रामपंचायतींना जादा
अधिकार देणेत आलेले आहेत.
परंतु , गेली ६४ वर्षांमध्ये अनेक जिल्हा परिषद अध्यक्ष झाले. यामध्ये श्रीमती गायत्री देवी पंतप्रतिनिधी, हेमलताताई ननावरे, भाग्यश्रीताई भाग्यवंत, ज्योतीताई जाधव, अरुणाताई पिसाळ या पाच महिलांना संधी मिळाली. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष महिला असतानाही स्वीय सहाय्यक म्हणून अनेक पुरुषांना संधी देण्यात आली. यामध्ये कर्तबगार महिला असूनही त्यांना संधी मिळाली नाही. अखेर ६४ वर्षाने पुरोगामी विचारसरणीच्या सुशिक्षित महिला म्हणून डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांना जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून भाजपने संधी देण्याचा निर्णय झाला. आणि खऱ्या अर्थाने सातारा जिल्हा परिषदेच्या इतिहासात महिलांच्या कर्तबगारीला वाव मिळाला .
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष स्वीय सहाय्यक पदावर एक कर्तव्यदक्ष व जबाबदार महिलेला संधी मिळाली आहे. एकात्मक बाल विकास प्रकल्प अंतर्गत पर्यवेक्षक असलेल्या कोरेगावच्या वृंदा शिवदे सध्या सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. प्रियाताई शिंदे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून समर्थपणाने जबाबदारी पेलत आहेत. ही खऱ्या अर्थाने परिवर्तनाची नांदी आहे. मुळातच अध्यात्मिक विचारसरणीच्या अध्यक्ष डॉ. प्रियाताई शिंदे यांनी बोलून नाहीतर करून दाखवले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने नारीशक्तीचा विजय झालेला आहे. याचे कौतुकच केले पाहिजे. त्यांच्या हातून अशाच चांगल्या गोष्टी घडाव्या यासाठी सर्व सातारा जिल्हा त्यांच्या पाठीशी राहील अशा अनेकांनी शुभेच्छा दिलेले आहेत.
एकेकाळी सातारा जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा माहिती अधिकारी, तुरुंगाधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास अधिकारी, नगराध्यक्ष, जि.प. अध्यक्ष या पदावर कर्तबगार महिला विराजमान झाल्या होत्या. त्यावेळी महिला राज पाहण्यास मिळाले होते. आता सातारा जिल्हा परिषदेमध्ये जि प अध्यक्ष व स्वीय सहाय्यक महिला असल्यामुळे खऱ्या अर्थाने नारी शक्तीचा संगम झाल्याचे प्रथमच दिसून आले आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले त्या सातारा जिल्ह्यात पुरुषप्रधान संस्कृतीला बाजूला करून महिलांना संधी देण्याची ही पहिलीच वेळ असल्यामुळे जिल्हा परिषद कारभाराला सुद्धा शिस्त लागेल असे बोलले जात आहे.
————————————————–
फोटो– सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष कार्यालय व स्वीय सहाय्यक केबिन (छाया- अजित जगताप, सातारा)




