मुंबई(अर्जुन भेदाटे) : मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रकार समोर आला आहे. आज सकाळी सीएसएमटी ते पनवेल मार्गावरील वडाळा रोड ते पनवेल १.०२ वाजताची लोकल प्रवासात असताना डब्यातील एक पंखा संरक्षण जाळी (सेफ्टी कव्हर) नसतानाही पूर्ण वेगाने फिरत असल्याचे निदर्शनास आले.
लोकलमधील पंख्यांवर संरक्षण जाळी बसवणे बंधनकारक असताना अशी गंभीर निष्काळजीपणा प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण करणारी आहे. विशेषतः गर्दीच्या वेळेत उभ्या प्रवाशांच्या डोक्याला, हाताला किंवा सामानाला गंभीर इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला असून, रेल्वे प्रशासनाने तात्काळ याची दखल घेऊन संबंधित पंखा दुरुस्त करावा व सर्व डब्यांतील सुरक्षेची तपासणी करावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.
मुंबई लोकल ही लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड न करता अशा त्रुटी तातडीने दूर करणे अत्यावश्यक आहे, अशी भावना प्रवाशांनी व्यक्त केली आहे.




