सातारा(अजित जगताप) : छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा शहरात बघावे तिकडे अनाधिकृत टपरी ,होर्डिंग व फ्लेक्स दिसून येत आहे. परंतु कारवाई होत नसल्याने अखेर होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा अशी सूचना सातारा जिल्हा अधिकाऱ्यांना द्यावी लागली .तरीही फक्त रस्त्यावरील लहान अँगल काढून या सूचनांचे पालन केल्याची चर्चा सातारा शहरात सुरू झालेली आहे.
सातारा जिल्ह्यात दुष्काळी भाग वगळता यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा मोठ्या प्रमाणात वादळ वारं व पाऊस येणार असल्याचे हवामान खात्याने अंदाज वर्तवले आहेत. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन तसेच प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. जीवित व वित्तहानी होऊ नये. यासाठी सातारा जिल्ह्यातील सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे. अशी सूचना सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकीत केली होती. त्यानंतर गेले दोन दिवसापासून सातारा शहरातील रस्त्याकडे उभे छोटे अँगल व छोटे बॅनर व फ्लेक्स सातारा नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी युद्ध पातळीवर काम दिवसभर सुरू आहे. त्यामुळे काहीसा दिलासा सातारा नगरपालिकेच्या करदात्यांना मिळाला आहे.
मुंबई शहरातील घाटकोपर या ठिकाणी मोठे अँगलचे होल्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत अनेकांना बळी गेले . काही जखमी झालेले आहेत. अशा दुर्घटनेची पुनरावृत्ती सातारा शहरात होऊ नये . यासाठी जिल्हा प्रशासन व सातारा नगरपालिका तसेच जिल्ह्यातील अनेक नगरपालिका, ग्रामपंचायत, नगरपंचायत सज्ज झाली आहेत. ही चांगली गोष्ट असली तरी शासकीय कामकाज व नियमांची काटेकोरपणाने अंमलबजावणी होत आहे का नाही ? याची पाहणी करण्याची जबाबदारी निश्चित करावी व त्याबाबत हलगर्जीपणा व कुत्राही करणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तिका मध्ये दोन करून त्यांची वेतन वाढ थांबवावी अशी मागणी होऊ लागलेली आहे.
अनेक जण आपली जबाबदारी व कर्तव्य पार पाडत नाहीत .हेच दिसून आल्यामुळे आता थेट सातारा जिल्हा अधिकारी जितेंद्र डुडी यांनाच जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या मान्सून पूर्व आढावा बैठकीत सूचना द्यावी लागली.
वास्तविक पाहता सातारा जिल्हाधिकारी हे लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी तसेच दुष्काळ निवारण, आपत्ती व्यवस्थापन समिती व महसूल विभाग व सर्व प्रमुख विभागाचे प्रशासकीय अधिकारी आहेत. परंतु आता त्यांना सर्वच गोष्टीकडे लक्ष द्यावे लागत आहे. ही बाब आता साताऱ्यातील जनतेच्या निदर्शनास आलेली आहे. सातारा जिल्ह्यातील अनधिकृत होर्डिंग उभे करणाऱ्या मालकांवर गुन्हा दाखल करावेत. दि ५ जून पर्यंत सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट प्रमाणपत्र सादर करावे व केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करावा. अशी सूचना केलेली आहे .आता या सूचनांची काटेकोरपणाने अंमलबजावणी होणे हे गरजेचे आहे. पण, मनुष्यबळ कमी असल्यामुळे तसेच काहींवर बंधने येत असल्याने सध्या छोट्या छोट्या रस्त्यावरील अँगल काढून सातारा जिल्हाधिकाऱ्यांची सूचनांची अंमलबजावणी केल्याचा दिखावा केला जात असल्याची टीका होऊ लागलेली आहे.
नेहमीचे पावसाळ्याप्रमाणे सातारा नगरपालिकेमध्ये अनेक ठिकाणी अतिक्रमण झाल्यामुळे स्वच्छतेचा बोजवारा उडलेला आहे . जागोजागी अतिक्रमण सुद्धा काँग्रेस गवतासारखे वाढलेले आहे. सातारा नगरपालिकेचा अतिक्रमण विभाग आहे. या विभागामध्ये कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचारी यांच्यावर राजकीय दबाव येत असेल तर त्यांच्या कर्तव्याबद्दलही शंका उपस्थित केली जात आहे. दिलेल्या जबाबदारीतून सातारा शहरातील नागरिकांना नागरिक सुविधा मिळाव्यात हे अपेक्षा आहे. पण सातारा शहरातच नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्यात चलता है…. चलने दो… अशा पद्धतीने कायद्याची अंमलबजावणी होत आहे. हे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी चांगली गोष्ट नाही. असे आता काही सामाजिक कार्यकर्ते तक्रार करू लागलेले आहेत.
सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डू डी यांनी सक्त सूचना करून आठवड्यानंतर म्हणजेच पाच जून रोजी अहवाल मागवलेला आहे. हा अहवाल जनतेला खुला करून दिल्यास ज्यांच्या तक्रारी आहेत .त्याची फेरतपासणी करून कर्तव्य व जबाबदारीने काम करण्यास कुचराई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जोपर्यंत कारवाई होत नाही. तोपर्यंत ही मोहीम म्हणजे बोलाचीच कडी व बोलाचाच भात होईल. अशी शंका घेतली जात आहे. दरम्यान मोठे होल्डिंग व धोकादायक फलक मुक्त सातारा व्हावा यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे महिला वर्ग व ज्येष्ठ नागरिक सांगू लागलेले आहेत.




