प्रतिनिधी : एअर इंडियाच्या फ्लाइट 171 या बोईंग विमानाचा भीषण अपघात अहमदाबादमध्ये झाला असून, या दुर्घटनेत 241 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या हृदयद्रावक घटनेत फक्त एकच प्रवासी सुदैवाने बचावला आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबीयांवर शोकसागर ओढावला आहे.
या विमान कंपनीचे संचालन टाटा ग्रुपकडे असल्यामुळे, टाटा ग्रुपने दुर्घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त करत, सामाजिक बांधिलकी जपत मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच, अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांच्या संपूर्ण वैद्यकीय खर्चाची जबाबदारीही टाटा ग्रुपने घेतली आहे.
टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी पत्रक जारी करत म्हटले की, “या दुर्घटनेने आम्ही अत्यंत व्यथित झालो आहोत. मृतांच्या कुटुंबीयांप्रती आमच्या सहवेदना आणि प्रार्थना आहेत.” त्यांनी यासोबतच बी.जे. मेडिकल कॉलेजच्या कोसळलेल्या वसतिगृहाच्या पुनर्बांधणीसाठीही टाटा ग्रुपकडून मदतीचे आश्वासन दिले.
या भीषण अपघातानंतर विमाननिर्माता बोईंग कंपनीकडून तांत्रिक तपासासाठी तज्ज्ञांची टीम भारतात येणार आहे. यासाठी टाटा सन्सचे अध्यक्ष चंद्रशेखरन यांनी बोईंग सीईओंसोबत थेट संपर्क साधला आहे. अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी जीई एरोस्पेसकडूनही तांत्रिक सहाय्य दिले जाणार आहे.
या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते विजय रुपाणी हेही प्रवास करत होते. दुर्दैवाने, त्यांचा देखील अपघातात मृत्यू झाला असून, ही माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
या शोकांतिका दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.