Friday, June 20, 2025
घरमहाराष्ट्रक्रांतिसिंह नाना पाटील यांच्या घरातील सुनेला घोणसच्या पिल्लाने घेतला चावा; नागरिकांमध्ये भीतीचे...

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या घरातील सुनेला घोणसच्या पिल्लाने घेतला चावा; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कराड(विजया माने) : काही दिवसांपूर्वी कराड येथील प्रीतीसंगम बागेत सापडलेल्या ११ घोणस (विषारी साप) पिल्ल्यांमुळे परिसरात खळबळ उडाली होती. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने घाट काही दिवसांसाठी बंद केला होता. मात्र, घाट बंद असला तरी त्याच्या समोरील भागात असलेले खाऊगाडीचे व्यवसाय सुरुच होते.

या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कडेगाव येथून आलेल्या पर्यटक महिलेला, ज्या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या घरातील सून असल्याची माहिती आहे, घोणसच्या एका पिल्ल्याने चावा घेतला. ही घटना घाट परिसरालगत घडली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जखमी महिलेला तातडीने कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांना सध्या देखरेख (विषरोधक औषधांखाली) ठेवण्यात आले आहे. रुग्णालय प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, महिलेची प्रकृती सध्या स्थिर असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि पर्यटकांकडून संताप व्यक्त होत असून, “घाट बंद असल्याचा केवळ दिखावा करण्यात आला होता, प्रत्यक्षात संपूर्ण परिसर पूर्णतः सुरक्षित करण्यात आलेला नव्हता,” असा आरोप नागरिक करत आहेत.

“घोणसचा साप जरी आकाराने लहान असला तरी त्याचा दंश जीवघेणा ठरू शकतो. अशा परिस्थितीत माणसाचा जीव मोठा आहे, याची जाणीव प्रशासनाला असली पाहिजे,” अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे.

नागरिकांच्या मागणीनुसार, प्रीतीसंगम परिसर पूर्णतः निर्जंतुकीकरण होईपर्यंत आणि सर्पमुक्त असल्याची खात्री होईपर्यंत घाट तसेच परिसर पूर्णपणे बंद ठेवण्यात यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.

कराड नगरपालिकेला आणि वनविभागाला याबाबत अधिक कठोर उपाययोजना कराव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments