मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील काचनपूर ग्रामपंचायतीतील शेतकरी गेल्या पाच वर्षांपासून महावितरण कंपनीकडून वीज कनेक्शनच्या प्रतिक्षेत आहेत. शेतकऱ्यांनी प्रत्येकी ५८००/- रुपये भरून देखील आजतागायत वीज कनेक्शन मिळालेले नाही.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, महावितरण (अल्लापली विभाग) कंपनीने वीज जोडणीसाठी पैसे घेतले, मात्र कोणतीही सेवा पुरवली नाही. अनेक वेळा कंपनीच्या कार्यालयात जाऊन विचारणा केली असता कर्मचारी टाळाटाळ करत असल्याची तक्रार आहे.
या प्रकरणात शेतकऱ्यांनी मा. मुख्यमंत्री उपसचिव हनुमंत आरगुंडे आणि उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार नोंदवून दोषी कर्मचाऱ्यांवर चौकशी करून कार्यवाहीची मागणी केली आहे. यासोबत त्यांनी १८ फेब्रुवारी २०२५ रोजी पाठवलेल्या अर्जाची प्रत व डिमांड रसीदही जोडलेली आहे.
शेतकऱ्यांनी वीज मिळेल या आशेवर लाखो रुपये खर्चून मोटरपंप व बोअरवेल घेतले. मात्र, वीज नसल्यामुळे सिंचन होऊ शकले नाही आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांनी हा प्रकार अन्यायकारक व फसवणूक करणारा असल्याचे सांगितले असून, तत्काळ वीज कनेक्शन देण्यात यावे, अन्यथा मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे.