मुंबई (प्रतिनिधी २१ मे) : दहशतवादाला संपवण्यासाठी भारताने पुकारलेल्या ‘सिन्दुर ऑपरेशन’च्या यशानंतर, संपूर्ण देशात देशभक्तीचा ज्वार उसळताना दिसतोय. त्याच पार्श्वभूमीवर, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी आज मुंबईतील प्रेस क्लबमध्ये जोरदार घोषणा करत “भारत जिंदाबाद यात्रा” देशभर काढण्यात येणार असल्याचे सांगितले!
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २८ निरपराध पर्यटकांच्या क्रूर हत्येचा सूड घेण्यासाठी भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. हा सैन्यदलाचा पराक्रम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली झालेली अचूक कारवाई संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद असल्याचे आठवले यांनी ठणकावून सांगितले.
“भारताचे दहशतवादाविरुद्ध युद्ध अजून संपलेले नाही, पण प्रत्येक लढाईत आपण विजयी होत आहोत. सैन्याच्या शौर्याला सलाम करावा तितका थोडाच आहे,” असे म्हणत आठवलेंनी मोदी सरकारच्या धाडसी निर्णयाचे कौतुक केले.
२२ मे ते ६ जून दरम्यान, रिपब्लिकन पक्ष भारतभर “भारत जिंदाबाद यात्रा” काढणार आहे. तिरंगा हाती, भारतमातेच्या जयघोषासह ही यात्रा महाराष्ट्रासह देशातील प्रत्येक राज्य, जिल्हा आणि तालुक्यातून दणक्यात निघणार आहे.
“रिपब्लिकन पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी ही यात्रा आपल्या भागात यशस्वी करावी आणि सामान्य जनतेनंही यात उत्स्फूर्त सहभाग घ्यावा,” असं आवाहन आठवलेंनी केलं आहे.
भारताच्या रक्षणासाठी उभ्या असलेल्या भारतीय सैन्याचं हे समर्थन आणि देशभक्तीचा उत्सव – ‘भारत जिंदाबाद यात्रा’द्वारे साजरा होणार आहे.