प्रतिनिधी : जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मॉन्सून मुंबईत दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागामार्फत वर्तविण्यात आला आहे. यंदाच्या पावसाळ्यात मुंबईत विशेषता सखल भागात पावसाचे पाणी साचू नये. रस्ते व रेल्वे वाहतुकीवर त्याचा परिणाम होऊ नये. समुद्रात मोठी भरती असताना कोणतीही जीवित व वित्तीय हानी होऊ नये. यासाठी आवश्यक त्या उपाययोजना लवकरात लवकर पूर्ण करून यंत्रणा सज्ज ठेवण्यात यावी. तसेच, कोणत्याही आपत्कालिन दुर्घटनेप्रसंगी शीघ्र मदतीसाठी एनडीआरएफ’ शहर भागात – १, पूर्व आणि पश्चिम भागात प्रत्येकी – २ तुकड्या तैनात करण्यात याव्यात, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी संबंधित महापालिका यंत्रणेला आणि विविध प्राधिकरणांना दिले आहेत.
यंदाच्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका क्षेत्रातील विविध यंत्रणांमध्ये सुयोग्य समन्वय साधला जाण्याच्या दृष्टीने अतिरिक्त आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांची महापालिका मुख्यालयात मंगळवारी दुपारच्या सुमारास बैठक पार पडली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्पत) अभिजीत बांगर, महापालिकेचे उप आयुक्त (सामान्य प्रशासन) किशोर गांधी यांच्या सह सातही परिमंडळांचे उप आयुक्त, सहाय्यक आयुक्त, विविध प्राधिकरणाचे संबंधित जबाबदार अधिकारी, पालिका विभागांचे खाते प्रमुख, संबंधित अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
मुंबईत पावसाळापूर्व कामांच्या तयारीच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी आढावा बैठक, संयुक्त भेटी तसेच गरजेनुसार तातडीचे सर्वेक्षण आदी बाबींची पूर्तता करावी. तसेच मुंबईतील नागरिकांना पावसाळा कालावधीत कोणत्याही गैरसोयीला सामोरे जावे लागणार नाही, याअनुषंगाने यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी दिले. आगामी पावसाळ्याच्या कालावधीत नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे आपल्या अनुभवांसह आणि उत्तम समन्वयाने योगदान द्यावे, असेही आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
या बैठकीते,मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने सुरु असलेल्या कार्यवाहीबाबत संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
शहर व उपनगरात ‘ एनडीआरएफ’ च्या पाच तुकड्या ; ग्रीन कॉरिडॉर
महापालिका क्षेत्रामध्ये कोणत्याही आपत्कालिन दुर्घटनेप्रसंगी युद्धपातळीवर बचावकार्य करण्यासाठी शहर व उपनगरात ‘ एनडीआरएफ’ च्या पाच तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. ‘ एनडीआरएफ’ शहर भागात – १, पूर्व आणि पश्चिम भागात प्रत्येकी – २ तुकड्या तैनात करण्यात याव्यात. तसेच, आपत्तीप्रसंगी ‘ एनडीआरएफ’च्या
तुकडीला घटनास्थळी तातडीने पोहचण्यासाठी विशेष मार्गिका (ग्रीन कॉरिडॉर) वाहतूक पोलिसांनी तयार करून देण्यात यावा, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी महापालिका यंत्रणेला दिले आहेत.
मॅनहोल झाका, रेल्वे, रस्ते वाहतूक सुरळीत ठेवा
पावसाळ्यात पाणी साचण्याच्या घटनांमुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि कोणतीही दुर्घटना घडून जीवित हानी होऊ नये यासाठी महापालिका उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांनी पर्जन्य जलवाहिन्या विभागामार्फत समन्वय साधून पंप आणि डिझेल जनरेटर संच बसवण्याचे नियोजन करावे. तसेच,मॅनहोलची झाकणे खुली राहणार नाहीत यासाठीची खबरदारी घ्यावी. तसेच रेल्वे परिसरामध्ये पाणी साचून उपनगरीय लोकल वाहतूक विस्कळीत होणार नाही, यासाठी रेल्वे आणि पर्जन्य जलवाहिन्या विभागाने संयुक्तपणे काम करावे, असेही निर्देश डॉ. शर्मा यांनी दिले.
संरचनात्मक स्थैर्य प्रमाणपत्र प्राप्त नसलेल्या फलकांचा परवाना रद्द करा
घाटकोपर येथे मोठा जाहिरात फलक कोसळून झालेली दुर्घटना व त्यामधील जीवित हानी पाहता मुंबईते विविध प्राधिकरणांच्या अखत्यारितील जागेवर लावण्यात आलेल्या जाहिरात फलकांची झाडाझडती घेण्यात यावी. सदर जाहिरात फलक सुस्थितीत असल्याबाबत संरचनात्मक स्थैर्य प्रमाणपत्र प्राप्त झाल्याची खात्री करावी. ज्या फलकांसाठीचे संरचनात्मक स्थैर्य प्रमाणपत्र प्राप्त होणार नाही, अशा फलकांचा परवाना रद्द करावा, असे निर्देश डॉ. शर्मा यांनी बैठकी दरम्यान दिले.
त्याचप्रमाणे मोबाईल टॉवरच्या अनुषंगानेही संरचनात्मक स्थैर्य प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित कंपन्यांना दिले. कोणतीही दुर्घटना घडू नये याअनुषंगाने संबंधित यंत्रणांनी संयुक्त पाहणी करत पुरेशी काळजी घ्यावी, असेही त्यांनी आदेशित केले.
पावसाळ्याचे दिवस पाहता मुंबईतील मोठी रूग्णालये तसेच उपनगरीय रूग्णालये याठिकाणी विजेसाठीचा पर्याय म्हणून डिझेल जनरेटर संच हे संपूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत का ? यासाठीचा आढावा घ्यावा, अशा सूचना त्यांनी आरोग्य विभागाला दिल्या. तसेच पावसाळी आजाराच्या अनुषंगाने पुरेशा प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी सर्व यंत्रणांनी सहकार्य करावे, असेही आवाहन डॉ. शर्मा यांनी केले.
यंदाही पावसाळ्यात समुद्रात मोठी भरती असणार आहे. त्यामुळे समुद्रात मोठ्या लाटा उसळतील. त्या दृष्टीने याप्रसंगी कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी समुद्र किनारी आवश्यकतेनुसार जीवरक्षक हे अतिरिक्त प्रमाणात तैनात करावेत, अशा सूचना त्यांनी अग्निशमन दलाला दिल्या. तसेच, विविध यंत्रणांनी सतर्क रहावे, असेही निर्देश त्यांनी याप्रसंगी दिले.
धोकादायक इमारतींमधील रहिवाशांचे स्थलांतर करा
मुंबईत दरवर्षी धोकादायक इमारती, इमारतींचा भाग कोसळण्याच्या दुर्घटना घडतात. त्यामध्ये कमी – अधिक प्रमाणांत जीवित की वित्तीय हानी होते. ही गंभीर बाब लक्षात घेता धोकादायक इमारती, दरडप्रवण क्षेत्राच्या ठिकाणी सुरू असणाऱ्या संरक्षक भिंतीच्या कामाच्या प्रगतीचा आढावादेखील याप्रसंगी घेण्यात आला. तसेच धोकादायक इमारतीत वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षित व पर्यायी स्थलांतराच्या अनुषंगानेही डॉ. शर्मा यांनी संबंधित यंत्रणांना सूचना केल्या.