प्रतिनिधी :
नवी मुंबई महानगरपालिकेने ऐरोली सेक्टर 15 येथे उभारलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्यतम स्मारक देशापरदेशातील विविध स्मारकांपेक्षा अत्यंत आगळे वेगळे आणि ज्ञान हीच शक्ती या बाबासाहेबांच्या प्रेरणादायी विचारांचे मूर्तीमंत दर्शन घडविणारे ज्ञानस्मारक असल्याचे अभिप्राय स्मारकाला भेट देणा-या विविध क्षेत्रातील मान्यवरांप्रमाणेच लाखोंच्या संख्येने स्मारकाला भेट देणा-या सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केले आहेत.
बाबासाहेबांचे हे पुतळा विरहीत स्मारक येथील समृध्द ग्रंथालय आणि इतर अनेक सुविधा कक्षांमधून बाबासाहेबांच्या विचारांचे ठायीठायी दर्शन घडविते तसेच बाबासाहेब जणू आपल्यासोबतच आहेत अशी अनुभूती देत असल्याच्या प्रतिक्रिया याठिकाणी व्याख्यानांमध्ये अनेक नामवंत विचारवंतांनी तसेच स्मारकाला भेट देणा-या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वेळोवेळी जाहीरपणे व्यक्त केल्या आहेत.
5 डिसेंबर 2021 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनाच्या पूर्वसंध्येला स्मारकातील विविध अत्याधुनिक सुविधांचे लोकार्पण झाले होते. तेव्हापासून मागील 3 वर्ष 4 महिन्यांमध्ये म्हणजेच 12 एप्रिल 2025 पर्यंत स्मारकाला देशापरदेशातून 3 लाख 61 हजारहून अधिक इतक्या मोठ्या संख्येने नागरिकांनी रजिस्टरवर नोंद करीत भेट दिली आहे व प्रत्येकाने या स्मारकाच्या वेगळेपणाचे मुक्तकंठाने कौतुक केले आहे.
स्मारकामध्ये बाबासाहेबांचे जीवनचरित्र दर्शन घडविणारे दूर्मीळ छायाचित्रांचे दालन, ऑडिओ व्हिज्युअल सुविधांनी परिपूर्ण इ- लायब्ररीसह समृध्द ग्रंथालय, अत्याधुनिक होलोग्राफीक आभासी चलचित्रप्रणालीव्दारे बाबासाहेबांचे प्रत्यक्ष भाषण ऐकण्याची सुविधा, एकाच वेळी 200 व्यक्ती ध्यान करू शकतील असे भव्यतम ध्यानकेंद्र, संविधानाविषयीच्या पुस्तकाचे विशेष दालन तसेच 250 आसन क्षमतेचे वातानुकुलीत प्रशस्त सभागृह अशा उत्तम दर्जाच्या सुविधांनी हे स्मारक वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे. स्मारकाचा 50 मीटर उंचीचा भव्य डोम रस्त्यावरून लांबूनच नजरेत भरतो व लक्ष वेधून घेतो. बाबासाहेबांच्या ज्ञानसंपन्नतेचे प्रतिक म्हणून या डोमला पेनच्या नीबचा आकार देण्यात आलेला आहे.
‘ज्ञान हीच शक्ती’ या बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित ग्रंथावर पेन हाती धरलेली भव्यतम आकर्षक शिल्पाकृती ही जणू या स्मारकाचा आत्मा आहे. याठिकाणी ज्ञानजागर व्हावा यादृष्टीने अगदी सुरुवातीपासूनच येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांची व्याख्याने ‘विचारवेध’ या शिर्षकांतर्गत आयोजित करण्यात आलेली आहेत. याशिवाय बाबासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘जागर’ ही व्याख्यानमाला आयोजित करून बाबासाहेबांच्या प्रेरणादायी स्मृतींना वैचारिक आदरांजली अर्पण करण्याची परंपरा अव्याहत सुरु आहे.
यामध्ये श्री. उत्तम कांबळे, डॉ. नरेंद्र जाधव, डॉ. भालचंद्र मुणगेकर, डॉ. सुखदेव थोरात, डॉ. रावसाहेब कसबे, श्री. गिरीश कुबेर, श्री.राजीव खांडेकर, श्री. हरी नरके, श्री. नागराज मंजुळे, श्री. अरविंद जगताप, श्री. बाबा भांड, डॉ. गणेश चंदनशिवे, श्री. योगीराज बागुल, आदी विविध क्षेत्रातील मान्यवर व्याख्याते सहभागी झाले आहेत.
यावर्षीही ‘जागर 2025’ मध्ये प्रा.प्रवीण दवणे, डॉ.हरीश वानखेडे, श्री.अरूण म्हात्रे, प्रा.हर्षद भोसले, श्रीम.छाया कदम, प्रा.मृदुल निळे अशा नामांकितांसह विविध क्षेत्रात कर्तबगारी गाजविणा-या युवकांनी सहभागी होत व्याख्यानमाला यशस्वी केली. प्रत्येक व्याख्यानाला नागरिकांची उत्तम पसंती मिळाली. आजकाल वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे, पुस्तके वाचली जात नाहीत, व्याख्याने ऐकली जात नाहीत असे निराशावादी सूर उमटत असताना स्मारकातील प्रत्येक व्याख्यानाला सभागृह हाऊसफुल्ल भरून सभागृहाबाहेर एलईडी स्क्रिन लावून थेट प्रक्षेपण करणे गरजेचे व्हावे एवढी श्रोत्यांची गर्दी होत असल्याचे काहीसे दुर्मीळ चित्र येथे पहावयास मिळत आहे.
5 डिसेंबर 2021 रोजी लोकांसाठी खुले करण्यात आलेल्या या स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महापरिनिर्वाण दिन, संविधान दिन, बौध्द पौर्णिमा अशा चारही दिवशी नागरिकांची 7 – 8 हजारहून अधिक उपस्थिती लाभलेली आहे. शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी साधारणत: 300 हून अधिक नागरिक याठिकाणी भेटी देताना दिसतात. अनेक नागरिक आपल्या कुटुंबासह स्मारकामध्ये येऊन बाबासाहेबांच्या प्रेरक विचारांना सहकुटुंब अभिवादन करतात. अनेक ठिकाणच्या संस्था, मंडळे, समुह एकत्र येऊन स्मारकाची शैक्षणिक सहल आयोजित करताना दिसतात.
राज्यातील विविध जिल्ह्यांप्रमाणेच देशाच्या विविध प्रांतांतून तसेच परदेशातूनही नागरिक या स्मारकाचे वेगळेपण अनुभवण्यासाठी भेट देत असतात. विविध शाळा, महाविद्यालये आपल्या विद्यार्थ्यांच्या सहली स्मारक दर्शनासाठी आयोजित करीत असून हे स्मारक बघताना विद्यार्थ्यांचा ओसंडून वाहणारा उत्साह व बाबासाहेबांच्या बहुआयामी व्यक्तीमत्वाबद्दल त्यांच्या मनात दाटून आलेला आदर त्यांना नवी प्रेरणा देताना दिसतो.
5000 हजाराहून अधिक ग्रंथसंपदेने समृध्द असे येथील इ-लायब्ररी सुविधेसह अत्याधुनिक ग्रंथालय हे बाबासाहेबांनी लिहिलेल्या व त्यांच्या विचारांचा जागर करणा-या पुस्तकांमुळे अभ्यासकांसाठी एक महत्वपूर्ण सुविधा आहे. याठिकाणी आलेला प्रत्येक माणूस भारावून गेला आहे व त्याने या स्मारकाचे वेगळेपण इतरांना भरभरून सांगितले आहे. त्यामुळे केवळ सव्वातीन वर्षातच 3.5 लाखाहून अधिक नागरिकांनी याठिकाणी भेट देऊन, स्मारक पाहिल्यानंतर भारावून जाऊन या स्मारकाचा नावलौकीक सर्वदूर पसरविलेला आहे.
त्यामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी स्मारकाला भेट देणारी मोठी जनसंख्या विचारात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेने हा जयंती उत्सव सुव्यवस्थित रितीने संपन्न होण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक ते सर्व नियोजन केलेले आहे. तरी नागरिकांनी बाबासाहेबांना वैचारिक आदरांजली अर्पण करण्यासाठी जयंतीदिनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेक्टर 15, ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला आवर्जून भेट द्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.