मुंबई(प्रतिनिधी) : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी स्थापन केलेली शिवसेना नारायण राणे, छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे यांना कळलीच नाही. केवळ सत्तेच्या आणि स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी शिवसेना सोडली असल्याचा घणाघाती आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे उपनेते विश्वनाथ नेरुरकर यांनी केला. शिवसेना शाखाप्रमुख अशोक परब यांनी आपल्या प्रकृती गंभीर अस्वास्थ्यामुळे शाखा क्रमांक १४ च्या शाखाप्रमुख पदाचा राजीनामा दिला. या पदावर उपशाखा प्रमुख अभिलाष कोंडविलकर यांची नियुक्ती करण्यात आली. कांदिवली येथील ठाकूर संकुलातील कमांडर दत्ताजी साळवी मार्गावर शिवसेना शाखा १४ च्या उपशाखा संस्कृती तर्फे महाराष्ट्र वाहतूक सेनेचे पदाधिकारी शाम साळवी आणि शिवसेना पदाधिकारी अमित मोरे यांनी अशोक परब यांच्या सत्काराचे आयोजन केले होते. शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, उपनेते विश्वनाथ नेरुरकर, माजी आमदार विलास पोतनीस यांच्या शुभहस्ते शुभदा शिंदे, चेतन कदम, नंदकुमार मोरे,अभिलाष कोंडविलकर, रेखाताई बोऱ्हाडे, रोहिणी चौगुले, शशिकांत झोरे, संजय जोजन, भाविका नवलू, वसंत तांबे, तुकाराम जोशी, अशोक म्हामूणकर आदी पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलतांना विनोद घोसाळकर आणि विश्वनाथ नेरुरकर यांनी शिवसेना हे एक कुटुंब असून त्या पद्धतीने वागण्याचा आणि पद कोणतेही असो शिवसैनिक हे पद महत्त्वाचे आहे असे समजून कार्यरत राहण्याचा तसेच माजी पदाधिकाऱ्यांना योग्य तो सन्मान देण्याचा सल्ला दिला. या त्रिमूर्तींनी आपापल्या भाषणात अशोक परब यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री योगेश वसंत त्रिवेदी यांनी सांगितले की, पदावर असतांना अनेक सत्कार होतात परंतु पदावरुन उतरल्यावर सत्कार होणे ही त्या व्यक्तीच्या कार्याची पावती आहे, आज शाम साळवी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करुन अशोक परब यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे. शाम कदम यांनी सुद्धा अशोक परब यांच्या कामाचा गौरव केला.
नारायण राणे, छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे यांना शिवसेना कळलीच नाही ; विश्वनाथ नेरुरकर यांनी या नेत्यांवर केला स्वार्थीपणाचा आरोप
RELATED ARTICLES