मुंबई (रमेश औताडे) : अंबाझरी येथील प्रस्तावित डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन हे इतरत्र न हलवता त्याच ठिकाणीच उभारण्यात यावे, असे स्पष्ट आदेश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे आंबेडकरी चळवळीला मोठा दिलासा मिळाला असून, आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा यांनी राज्यभरात केलेल्या तीव्र आंदोलनाची शासनाने अखेर दखल घेतली आहे.
आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी या निर्णयाचे स्वागत करताना सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने उभारले जाणारे सांस्कृतिक भवन ही केवळ इमारत नसून, सामाजिक न्याय, समता आणि संविधानिक मूल्यांचे प्रतीक आहे. हे भवन अंबाझरीतच उभारण्याचा निर्णय हा जनभावनेचा सन्मान आहे.
या प्रश्नावर माजी मंत्री नितीन राऊत आणि आमदार विकास ठाकरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. शासनदरबारी वेळोवेळी निवेदन, बैठका आणि चर्चा करून त्यांनी या महत्त्वाच्या विषयाला प्राधान्य मिळवून दिले. त्यांच्या ठाम भूमिकेमुळेच सांस्कृतिक भवनाच्या जागेबाबतचा संभ्रम दूर होऊन स्पष्ट निर्णय घेण्यात आला, अशी प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाने या लढ्यात सहकार्य करणाऱ्या सर्व कार्यकर्ते, सामाजिक संघटना आणि नागरिकांचे आभार मानले आहेत. तसेच, निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करून काम सुरू करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.




