तलमावले/संदीप डाकवे : राज्याच्या राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या आणि मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
महत्वाच्या 5 महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे या शहरामध्ये ढेबेवाडी विभागातील
गावाकडच्या शिलेदारांनी ‘नगरसेवक’ पदाचा ‘सिक्सर’ मारला आहे, त्यामुळे विभागात आनंदाची लहर पसरली आहे.
ॲड.भारतीताई पाटील (मंद्रुळकोळे), डी.आर.पाटिल (महिंद), सौ.अश्विनी माटेकर
(माटेकरवाडी), विकास वायचळ (वायचळवाडी-कुंभारगाव), वैशाली मस्कर (येळेवाडी), दीक्षा कचरे (खळे) ही या शिलेदारांची नावे आहेत. यांची जन्मभूमी वांगव्हॅली
असली नरी सध्या कर्मभूमी मुंबई आहे. या कर्मभूमीत प्रत्येकांनी आपापल्या कर्तृत्वाचा झेंडा रावला आहे.
माथाडी नेते स्व.आण्णासाहेब पाटील यांच्या कन्या ॲड. सौ. भारती पाटील या कोपरखैराणे विभागातून नवी मुंबई महानगरपालिकेत विराजमान झाल्या आहेत. विशेष
म्हणजे त्यांचे पतीही निवडणुकीत विजयी झाले आहेत.
पाटण तालुका पंचायत समितीत उपसभापती पद भूषवलेले ज्ञानदेव रामचंद्र पाटील ऊर्फ
डी.आर.पाटील यांनी प्रभाग क्रमांक 2 (ड) मधून नगरसेवक म्हणून निवडून गेले आहेत.
कुंभारगाव (माटेकरवाडी) येथील सौ.अश्विनी अशोक माटेकर या नगरसेविका असून त्यांची दुसरी टर्म आहे.
वायचळवाडी (कुंभारगाव) येथील विक्रांत सुरेश वायचळ हे मानपाडा, मनोरमानगर, आझादनगर येथून ठाणे महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक 3 ड मध्ये 7,731 मते मिळवत विजयी झाले आहेत.
गेली १५ वर्षे युवक स्वराज्य प्रतिष्ठान या संघटनेच्या माध्यमातून सामाजकार्य करत पदाला गवसणी घातली आहे.
येळेवाडी (काळगाव) येथील रहिवाशी असलेल्या सौ.वैशाली सुनील मस्कर यांनी घणसोली नवी मुंबई प्रभाग क्र. 09 (क) मधून साईश्रद्धा सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून 10 वर्षे लोकांच्या संपर्कात राहून त्यांना अडीअडचणीच्या वेळी मदत केली आहे. त्याचाच परिपाक म्हणून त्या भरघोस मताने नगरसेविका झाल्या आहेत.
खळे येथील असलेल्या शिवसेना विभागप्रमुख सूर्यकांत कचरे
यांची कन्या कु.दीक्षा कचरे या प्रभाग क्रमांक 12(ड) मधून विजयी झाल्या आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेत सर्वात तरुण नगरसेविका म्हणून त्यांनी अनोखा रेकॉर्ड केला आहे.
यापूर्वीही कुंभारगाव येथील दमयंती आचरे यांनी नवी मुंबईत नगरसेविका पदावर काम केले आहे.
मुंबई सारख्या शहरात जाऊन आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेल्या या नवनिर्वाचित सदस्यांनी आता आपल्या भागातील लोकांच्या अडीअडचणी सोडवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा.
सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन..!




