
च

ेंबूर – मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चेंबूर प्रभाग क्रमांक १५५ मध्ये भाजपच्या उमेदवार वर्षा शेट्ये यांच्या प्रचाराला वेग आला आहे. सुमन नगर येथे भाजपच्या निवडणूक प्रचार संपर्क कार्यालयाचे उद्घाटन निरज उभारे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडले. यावेळी आर.पी.आय.चे संजय डोळसे, महायुतीतील विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी बोलताना निरज उभारे यांनी सांगितले की, महायुतीच्या पाठीशी चेंबूरची जनता खंबीरपणे उभी आहे. प्रभाग क्रमांक १५५ मधून अधिकाधिक मताधिक्याने कमळाचा उमेदवार महापालिकेत पाठवण्याचा जनतेचा निर्धार असून, उद्याचा महापौरही महायुतीचाच असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी वर्षा शेट्ये यांचे पती व माजी नगरसेवक श्रीकांत शेट्ये यांच्या राजकीय व प्रशासकीय अनुभवाचा प्रचाराला निश्चितच फायदा होईल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कामकाजाची जाण आणि नागरिकांच्या समस्यांचा अनुभव विकासाला दिशा देईल, असेही सांगण्यात आले.
कार्यालयाच्या उद्घाटनानंतर वर्षा शेट्ये यांनी सुमन नगर, दत्त नगर व समर्थ नगर परिसरात प्रचार फेरी काढून मतदारांशी थेट संवाद साधला. “राजकारण नव्हे, सेवा हा आमचा मूलमंत्र” असल्याचे सांगत त्यांनी प्रामाणिक काम करण्याचा शब्द दिला. प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनामुळे प्रभागात निवडणुकीची रणधुमाळी अधिकच रंगताना दिसत आहे.




