मुंबई : मुंबईतील राजकारणात काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप–प्रत्यारोप अधिक तीव्र होत आहेत. माजी मंत्री व काँग्रेस आमदार अस्लम शेख यांना जाणूनबुजून बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपाचे मुंबई अध्यक्ष व आमदार अमित साटम करत असल्याचा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे.
अस्लम शेख हे मालवणीतील गरिबांचे खरे आवाज असून त्यांना पोकळ धमक्या देण्याचे थांबवावे, तसेच टॉवर बांधताना मंगलप्रभात लोढा यांनी किती मंदिरे उद्ध्वस्त केली याचे उत्तर अमित साटम यांनी द्यावे, असा सवालही गायकवाड यांनी उपस्थित केला. “मुंबई ही काही फक्त अदानी, लोढा आणि कंभोज यांची नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या —
“ज्याच्या विरोधात आपण बोलत आहात तोच मालवणी पॅटर्न म्हणजे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शिख, बौद्ध सर्व जाती–धर्मांचे नागरिक सुसंवादाने राहणारा परिसर. अस्लम शेख हे त्या सामाजिक ऐक्याचे उद्गाते आहेत. त्याउलट एका विशिष्ट समाजाला वगळून लोढा टॉवर्समध्ये मुंबईच्या मूळ रहिवाशांनाही घरे दिली जात नाहीत.”
त्यांनी पुढे आरोप केले की —
▪ लोढा यांनी अंबोजवाडीत भर पावसात गोरगरीबांना उघड्यावर आणले
▪ भाटी गावची हिंदू स्मशानभूमी तोडली
▪ राठोडीत हिंदू कुटुंबांना नोटीस न देता बेघर केले
“मालवणीतील सामाजिक ऐक्य संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि त्यासाठी मालवणीतील हिंदूंना बेघर करत भाजपा ‘बांगलादेशी–रोहिंग्या’ मुद्दा फुगवत आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी अमित साटम व भाजपावर केला.
राजकीय पातळीवर आणखी टीका करत खासदार गायकवाड म्हणाल्या —
मुंबई महापालिकेत प्रशासकाच्या माध्यमातून भाजपा–महायुतीचेच सरकार आहे, राज्यातही त्यांचेच सरकार असून मुंबईकरांच्या कष्टाच्या पैशांची लूट सुरू आहे. मुंबईच्या मूलभूत प्रश्नांवर निवडणुका लढल्या पाहिजेत, पण मुद्दामच हिंदू–मुस्लिम वाद पेटवून जनतेचे लक्ष विचलित केले जात आहे. मात्र मुंबईकर भाजपाचा हा कुटील डाव ओळखून हाणून पाडतील.
या वक्तव्यामुळे मुंबईच्या राजकारणात नवीन वादळ उठण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




