ताज्या बातम्या

भाषा हे वादाचे नव्हे तर संवादाचे माध्यम – आशिष शेलार मुंबई मराठी पत्रकार संघात भाषिक पत्रकारितेचा जागर

ुंबई : ‘भाषा ही वादासाठी नव्हे तर संवादाचे माध्यम आहे. विविध भाषांच्या आदान–प्रदानातून संस्कृतीचा विकास होत असतो. हिंदी पत्रकारिता द्विशताब्दी वर्षानिमित्त आयोजित मराठी–हिंदी संपादक पत्रकारांच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन हे त्या दिशेने टाकलेले एक स्तुत्य आणि उत्तम पाऊल आहे,’ अशा शब्दांत महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी कौतुकाची भावना व्यक्त केली.
मुंबई मराठी पत्रकार संघ आणि काशी–वाराणसी विरासत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय हिंदी पत्रकारिता द्विशताब्दी साहित्य व मीडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या आझाद मैदान येथील पत्रकार भवनात आयोजित या सोहळ्यात देशभरातील १७ राज्यांतील संपादक, लेखक, अभ्यासक आणि पत्रकार सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्य साहित्य अकादमी, केंद्रीय शिक्षण मंत्रालय तसेच उत्तर प्रदेश शासनाचे सहकार्य या महोत्सवाला लाभले.
हिंदीतील पहिले वृत्तपत्र ‘उदन्त मार्तण्ड’ याच्या प्रकाशनाला यंदा २०० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने हिंदी पत्रकारितेच्या इतिहासातील मोलाच्या योगदानासाठी ज्येष्ठ पत्रकार राही भिडे, कमलेश सुतार, रेखा देशपांडे, विश्वास देवकर, शरद वैद्य (मरणोत्तर) यांना सन्मानित करण्यात आले. शरद वैद्य यांचा पुरस्कार त्यांचे सुपूत्र अजय वैद्य यांनी स्वीकारला.
यावेळी हिंदी पत्रकारितेतील भीष्माचार्य आणि कोकणचे सुपुत्र पत्रकार महर्षी कै. बाबूराव पराडकर यांचे स्मारक त्यांच्या मुळगावी सिंधुदुर्गात पराड येथे व्हावे अशी विनंती मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी मंत्री आशिष शेलार यांना केली. ‘राष्ट्रपती’सारखे अनेक शब्द हिंदी भाषेला पराडकरांनी दिल्याचा उल्लेखही यावेळी त्यांनी केला.
या महोत्सवाचे उद्घाटन आसामचे महामहिम राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी दूरदृष्य प्रणालीव्दारे केले. भाषेच्या माध्यमातून पत्रकार विचारांचे आदानप्रदान करतायत आणि त्यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघ आणि काशी विरासत फाऊंडेशनने पुढाकार घेतला असल्याचे कौतुक करत त्यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
या उपक्रमामुळे मराठी–हिंदी पत्रकारिता, भाषा संवाद आणि राष्ट्रीय पत्रकारिता अशा वैचारिक परंपरेचा नवा दुवा निर्माण झाल्याचा विश्वास काशी विरासत फाऊंडेशनचे राममोहन पाठक यांनी व्यक्त केला आहे.
या दोन दिवसीय सोहळ्यात ‘भारत : साहित्य आणि मीडिया महोत्सव’ अंतर्गत विविध चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्रात प्राध्यापक सोमा बन्द्योपाध्याय (कुलपति, शिक्षक प्रशिक्षण राज्य विश्वविद्यालय कोलकाता), इस्कॉनचे मुख्य ट्रस्टी प्रभु सूरदासजी, काशी विरासत फाउंडशनचे कार्याध्यक्ष राम मोहन पाठक, केन्द्रीय हिंदी निदेशालयाचे निदेशक हितेंद्र मिश्र. सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, कार्यवाह शैलेंद्र शिर्के, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, डॉ. अमिता दुबे आणि के. एन. श्रीवास्तव उपस्थित होते.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top