प्र
तिनिधी : धारावी परिसरातील पिवळ्या बंगल्यामागील मिठी नदीमध्ये अजूनही गाळ साचलेला असून, मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या कंत्राटाअंतर्गत संबंधित ठेकेदारांनी हे काम यंदाही दुर्लक्षित केल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी, अतिवृष्टी झाल्यास धारावीतील झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याचा धोका निर्माण झाला आहे.
गेल्या वर्षी देखील नागरिकांच्या तक्रारीनंतरच संबंधित यंत्रणांनी हालचाल केली होती आणि गाळ काढण्याचे काम उशिराने का होईना, पार पाडले गेले होते. मात्र, यंदा पुन्हा तसाच प्रकार घडत असल्याने “दरवर्षी तक्रार झाली कीच महापालिका जागे होणार का?” असा संतप्त प्रश्न धारावीतील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
स्थानिकांनी असा आरोप केला आहे की, महापालिका आणि ठेकेदार यांच्या संगनमताने प्रत्यक्षात न करता, केवळ कागदोपत्री गाळ काढल्याचे दाखवून निधी लाटण्याचा प्रकार दरवर्षी घडतो आहे.
या प्रकरणी संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली असून, मुंबई महापालिकेने या गंभीर विषयाची तत्काळ दखल घेणे अत्यावश्यक ठरत आहे. अन्यथा, पावसाच्या जोरात कोणतीही दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण, हा प्रश्न अनुत्तरित राहणार आहे.