गडचिरोली (प्रतिनिधी) – कांचनपूर गावात वीज विभागाच्या हलगर्जीपणामुळे ग्राहक व शेतकरी त्रस्त झाले असून, त्यांच्या पाठीशी आता गावातील युवक शक्ती खंबीरपणे उभी राहिली आहे. गाव व परिसरात सतत अघोषित वीज कपात, तांत्रिक बिघाडाच्या नावाखाली वीज पुरवठा बंद ठेवणे आणि कर्मचाऱ्यांकडून निष्काळजीपणा यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
गडचिरोली-लगाम चक वळणावर असलेल्या केंद्रातून डझनभर गावांना वीज पुरवठा केला जातो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या भागात वीजेची मोठी अडचण निर्माण झाली आहे. दिवसाच्या वेळी वीज गेल्यास अनेक तास परत येत नाही आणि रात्रीच्या वेळी वारंवार ऑन-ऑफ होत राहते. ग्राहकांचा आरोप आहे की, वीज विभागातील कर्मचारी जबाबदारीने काम करत नाहीत. माहिती मिळविण्यासाठी संपर्क साधला असता, फोन उचलला जात नाही किंवा फोन घेतल्यानंतर अरेरावीची भाषा वापरली जाते.
गेल्या १० दिवसांत कांचनपूरमध्ये पाच दिवस पूर्ण ब्लॅकआउटची स्थिती होती. दमट उष्णता आणि पावसाच्या तोंडावर अशी स्थिती लोकांना त्रस्त करणारी ठरली आहे. शेतकऱ्यांचे पाणीपुरवठा, मुलांचे अभ्यास, घरोघरी काम करणाऱ्या यंत्रसामग्रीचे कार्य यावर वाईट परिणाम झाला आहे. काही ठिकाणी दिवस-रात्र वीज गायब असते. पूर्वसूचना न देता अचानक वीज खंडित केली जाते.
गावातील युवक प्रसनजीत रॉय, सुदर्शन समदार, विशाल, गणेश बाला, सुरेश बाला, निमाई सरकार, राहुल मिस्ट्री आणि अजय मंडल यांनी परिस्थितीचा आक्रोश करत थेट लगम वीज केंद्र गाठले. तिथे अधिकाऱ्यांनी ‘तांत्रिक बिघाड’ सांगत वेळकाढूपणा केला. मात्र, युवकांनी अधिकाऱ्यांशी ठाम बोलून त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली. तेव्हाच ३० मिनिटांत वीज पुन्हा सुरू झाली.
ग्राहकांच्या रोषाचे कारण म्हणजे, ३० मिनिटांत सुरू होणारी वीज तीन-चार दिवस खंडित ठेवण्यात आली होती. जेव्हा लाईनमन वाघाडे यांना यावर विचारले गेले, तेव्हा त्यांनी उत्तर दिले, “आम्हाला पैसे मिळत नाहीत, म्हणून काम करायची इच्छा होत नाही.” त्यामुळे नागरिकांत अजूनच संतापाची लाट उसळली आहे.
याशिवाय, काही शेतकऱ्यांनी ५ वर्षांपूर्वी मीटर कनेक्शनसाठी अर्ज केलेला असूनही आजतागायत कनेक्शन मिळालेले नाही. एका शेतकऱ्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केल्यानंतर हे दबावतंत्र असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दोषी कर्मचाऱ्यांवर त्वरित कारवाई व्हावी आणि शेतकऱ्यांना पुन्हा त्रास होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थ आणि शेतकरी वर्गाने वीज विभागाकडे केली आहे.