सातारा(अजित जगताप) : सातारा शहरातील गुरुवार बाग ऐतिहासिक वारसा आहे .साताऱ्याच्या ऐतिहासिक अस्मितेचे प्रतीक आहे . गुरुवार पेठेतील छत्रपती शाहू उद्यानामध्ये ऐतिहासिक स्वरूपातील ‘तक्ताचा वाडा’ पुनर्बांधणी करून तेथे श्रीमंत छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या राज्यकारभाराचे भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी येसूबाई फाउंडेशनचे संस्थापक व माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी केली आहे. या स्मारकामुळे शाहू महाराजांच्या कार्याची स्मृती जपली जाईल आणि साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी ओळख मिळेल, असे त्यांनी सांगितले.
माजी उपनगराध्यक्ष सुहास राजे शिर्के यांनी सोमवारी नगराध्यक्ष अमोल मोहिते यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन हे निवेदन सादर केले .इतिहासातील विविध संदर्भांनुसार शाहू महाराजांनी तक्तांचा वाडा या ठिकाणी बसून अनेक राजकीय निर्णय, पत्रव्यवहार आणि ताम्रपट जारी केल्याचे उल्लेख आहेत. त्यामुळे या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी त्याच स्वरूपातील ‘तक्ताचा वाडा’ उभारण्यात यावा व त्यामध्ये राज्यकारभार करत असलेल्या शाहू महाराजांचा भव्य पुतळा उभारावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे भोसले, श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह राजे भोसले (लोकनियुक्त नगराध्यक्ष) आणि श्रीमंत छत्रपती अभयसिंह राजे भोसले (माजी सहकार मंत्री) यांच्या बद्दल सातारा नगरपरिषद प्रशासनाने या मागणीवर तातडीने निर्णय घ्यावा. अशी मागणी करण्यात आली आहे.




