मुंबई : राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त १८ जून ते २६ जून २०२६ कालावधीत घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धा व काव्य स्पर्धेला शाहूप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेत आलेल्या निबंधांपैकी प्रथम क्रमांक राजन पारकर, मुंबई यांच्या निबंधास जाहीर करण्यात आला आहे. तसेच अमित माने, कल्याण यांच्या काव्यास प्रथम क्रमांक व अमरसिंह जगदाळे, कोल्हापूर यांच्या काव्यास द्वितीय क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र व श्री राजर्षी शाहू महाराजांची प्रतिमा देण्यात येईल. या स्पर्धेचा हेतू लोकांमध्ये शाहू महाराजांच्या थोर कार्या विषयी जागरूकता निर्माण करणे असा आहे. याच उद्देशाने वर्षभर ही स्पर्धा सुरू ठेवून शासनाच्या मदतीने आयआयटी च्या विद्यार्थ्यां कडून व महापालिकेच्या शाळांमधून निबंध मागविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. यातून विजयी स्पर्धकांना
६ मे २०२७ रोजी राजर्षी शाहू महाराजांच्या पुण्यतिथी दिनी १३ वी गल्ली खेतवाडी, गिरगाव येथील महाराजांचा स्मृती स्तंभ असलेल्या ठिकाणी गौरवान्वित करण्यात येणार आहे. या ठिकाणी शाहू महाराजांचा राजवाडा होता व महाराजांचे निधन तेथे झाले होते. आता राजवाडा अस्तित्वात नाही परंतु मुंबईत शाहू स्मारक व्हावे, ही तमाम शाहू प्रेमींची मागणी आहे व त्यासाठी समिती सातत्याने प्रयत्नशील असल्याचे राजर्षी शाहू सलोखा मंच तसेच राजर्षी शाहू स्तंभ स्मृती समिती मुंबईच्या समन्वयक प्रज्ञा जाधव यांनी सांगितले.




