मुंबई(रमेश औताडे) : सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे मातंग समाजातील महिलेची गोळ्या झाडून हत्या झाल्याच्या घटनेबाबत सखोल आणि निष्पक्ष तपास करण्यात यावा, अशी मागणी समाजसेविका सुनीता तुपसौंदर्य यांनी केली आहे.
या घटनेचा त्यांनी तीव्र निषेध व्यक्त करत, दोषींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे म्हटले आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून अशा घटना समाजासाठी चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले.
हत्येमागील खरा सूत्रधार आणि कारणांचा सखोल तपास करून कोणालाही पाठीशी न घालता निष्पक्ष चौकशी करावी, तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही सुनीता तुपसौंदर्य यांनी केली आहे. शासन आणि पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.



