मुंबई : राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्याय, समता आणि वंचित घटकांच्या उत्थानासाठी आयुष्यभर संघर्ष केला. समाजातील वंचित आणि उपेक्षित घटकांना शिक्षण, सन्मान, समान संधी आणि न्याय मिळावा यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. डॉ आंबेडकर यांचे विचार समताधिष्टीत भारताच्या निर्मितीसाठी मार्गदर्शक आहेत, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज येथे केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ८१ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होताना राज्यपाल बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा आपल्याला समाजातील विषमता, जातीयवाद, उच्च-नीचतेची भावना तसेच स्त्री-पुरुष भेदभाव मिटवण्याचा संदेश देतो. समाजातील प्रत्येक व्यक्ती सक्षम आणि सशक्त व्हावी यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येकाला समान संधी आणि आत्मसन्मान देणारा भारत घडविणे हीच डॉ. आंबेडकरांना खरी आदरांजली ठरेल, असे राज्यपालांनी सांगितले.
समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केल्याने इतरांनाही उत्कृष्ट कार्य करण्याची तसेच राष्ट्र आणि समाजकार्याला वाहून घेण्याची प्रेरणा मिळते. अशा पुरस्कारांमुळे समाजात सकारात्मक विचार, परिश्रमाची वृत्ती आणि राष्ट्रसेवेची भावना अधिक दृढ होते असे राज्यपालांनी नमूद केले.
‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘विकसित भारत’ या संकल्पना साकार करण्यासाठी तसेच भारताला जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विकास सर्वसमावेशक असणे आवश्यक आहे. समाजातील प्रत्येक घटक विकासाच्या प्रवाहात सहभागी झाल्यास हे ध्येय सध्या होईल,असेही राज्यपालांनी सांगितले.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉ नीलम गोर्हे व उद्योजक पद्मश्री डॉ अशोक खाडे यांना सोसायटीतर्फे देण्यात येणारा ‘भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री तसेच पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रामदास आठवले, भदंत डॉ राहुल बोधी महाथेरो, सोसायटीचे विश्वस्त अॅड. उज्ज्वल निकम, विश्वस्त अॅड. बी. के. बर्वे, डॉ वेंकट स्वामी व अरविंद सोनटक्के, सोसायटीचे सचिव डॉ. वासुदेव गाडे, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, सोसायटीच्या कार्यकारिणीचे सदस्य चंद्रशेखर कांबळे तसेच पुरस्काराचे मानकरी उपस्थित होते.




