कराड(प्रताप भणगे) : सन 2022 मध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत उंडाळे–तुळसण रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले होते. मात्र उंडाळे गावाच्या हद्दीतील रस्त्यावर सध्या मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून “खड्डा कुठे आणि रस्ता कुठे?” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
उंडाळे येथील रस्त्यावर पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना त्यांचा अंदाज येत नाही. परिणामी दुचाकीस्वार, शालेय विद्यार्थी, शेतकरी आणि प्रवासी वाहनांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, 2022 मध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून झालेल्या रस्त्याची अवघ्या काही वर्षांत झालेली ही दुर्दशा कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. संबंधित विभागाने रस्त्याची तातडीने पाहणी करून खड्डे बुजवावेत, कामाची चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
उंडाळे येथील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाढलेला अपघाताचा धोका लक्षात घेता प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अन्यथा नागरिक आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील, असा इशारा देण्यात आला आहे.




