ताज्या बातम्या

जनगणना २०२६ : लिंगायत समाजाने ‘धर्म-हिंदू’, जात मूळ परंपरेनुसार लिहावी — आवाहन

मुंबई : महाराष्ट्रात १ मे २०२६ पासून सुरू होणाऱ्या भारतीय जनगणना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर वीरशैव-लिंगायत समाजात धर्म व जात नोंदणीबाबत स्पष्टता देण्यासाठी विविध सामाजिक व धार्मिक पदाधिकाऱ्यांनी आवाहन केले आहे. या निवेदनात धर्माच्या कॉलममध्ये ‘हिंदू’ असा उल्लेख करावा, तर जातीच्या कॉलममध्ये आपल्या पारंपरिक जातीनुसार (उदा. वाणी, कुंभार, तेली, गवळी इ.) नोंद करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
जनगणना तीन टप्प्यांत पार पडणार असून १ ते १५ मेदरम्यान स्वयं-जनगणना, १६ मे ते १४ जून दरम्यान घरगणना आणि फेब्रुवारी २०२७ मध्ये लोकसंख्या जनगणना होणार आहे. विशेषतः अंतिम टप्प्यात धर्म व जात यांची नोंद महत्त्वाची असल्याने समाजात कोणताही संभ्रम राहू नये, यासाठी हे मार्गदर्शन करण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, वीरशैव व लिंगायत हे वेगवेगळे नसून एकाच परंपरेची दोन नावे आहेत आणि हा समाज हिंदू धर्माचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे ‘वीरशैव लिंगायत’ असा स्वतंत्र धर्म म्हणून उल्लेख करणे चुकीचे व दिशाभूल करणारे असल्याचे स्पष्ट करण्यात आले. भारतीय राज्यघटनेनुसारही लिंगायत पंथाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता नसल्याचे सांगण्यात आले आहे.
समाजातील एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी आणि कायदेशीरदृष्ट्या अचूक नोंद होण्यासाठी सर्वांनी एकसमान पद्धतीने नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. धार्मिक, सामाजिक आणि राष्ट्रीय हित लक्षात घेऊन जनगणनेत योग्य माहिती देणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

Scroll to Top