कोडोली(अजित जगताप) : पावसाळ्याला आगमन होण्यास काही अवधी असतानाच सातारा शहरा नजीकच्या जनाई मळाई पायथ्याशी चंदन नगर येथे अवकाळी पावसाने काही नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. अनेकांच्या अन्न – वस्त्र व जीवनावश्यक वस्तूंमध्ये डोंगरावरील गढूळ पाणी शोधल्यामुळे त्यांच्यावर संकट असले तरी कुणीही तक्रार केली नाही. हे विशेष आहे.
याबाबत काही स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, चंदन नगर, कोडोली परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात फ्लोटिंग केले जात आहेत. यामुळे नैसर्गिकरित्या असलेले ओढे नाले बुजवले आहेत. विशेष बाब म्हणजे दिवस-रात्र जे.सी.बी. व पोकलॅण्ड साह्याने जमीन सपाटीकरण होऊन लाखो रुपये गोळा केले जातात. सातारा जिल्हा प्रशासन, भूमि अभिलेख, नगररचना आणि कोडोली ग्रामपंचायत अशा प्रत्येक विभागाचे याकडे बारकाईने लक्ष आहे. परंतु, नैसर्गिकरीत्या पाणी वाहून जाणारा ओढा व लहानसहान नाले बुजवल्याचे दुर्लक्ष झाले आहे. त्याचा आता डोंगर पायथ्याशी राहत असलेल्या स्थानिक गोरगरीब, कष्टकरी, शेतमजूर व हातावर पोट असणाऱ्या कामगारांना नाहक त्रास भोगाव लागत आहे.
काडी – काडी गोळा करून काहींनी मिळेल ते साहित्याद्वारे घर बांधले आहे. नेमके यंदा वळवाच्या पावसामुळे डोंगर पठारावरील गडूळ पाणी अनेकांच्या घरात शिरले. रात्रीच्या वेळी पाण्याचा लोंढा घरात शिरल्याने जीवनावश्यक वस्तू व साहित्य वाहून गेले. शेवटी याला निसर्ग जबाबदार की मानवनिर्मित संकट? याचा आता शोध सुरू झालेला आहे.
सातारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून या जागेची पाहणी करून संबंधितांवर कारवाई दूरच पण साधं पाहणी व अहवाल सादर करण्याची ही खबरदारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व ग्रामपंचायत घेणार नाही. त्यामुळे लेखी तक्रार देऊन काही फायदा नाही. अशी मानसिकता गोरगरिबांची झालेली आहे.
पूर्वी सातारा जिल्ह्यात एखादी घटना घडल्यानंतर तातडीने शासकीय अधिकारी व कर्मचारी जागेवर जाऊन पंचनामा करत होते व गोरगरिबांना संकटसमयी दिलासा मिळत होता. यासाठी लोकप्रतिनिधी सुद्धा तातडीने सूचना करत होते. आता बिल्डरने पोसलेले काही स्थानिक लोकप्रतिनिधी आणि भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी सत्तेच्या माध्यमातून सत्ता व प्रशासकीय यंत्रणेत ठाण काढून बसलेले आहेत. त्यांच्या परवानची विना सामान्य माणसांना शोष खड्डा काढता येत नाही. पण, धन दांडगे व बिल्डर डोंगर पोखरून त्यातून गौण खनिजाची विल्हेवाट लावतात. या सर्व गोष्टीला शासकीय यंत्रणात जबाबदार आहे आणि जी यंत्रणा प्रथम दर्शनी जबाबदार आहे. त्यांच्याकडे लेखी तक्रार करून त्यांचा दर वाढवून ठेवण्याची इच्छा नाही. असं सत्य व प्रामाणिक मत काही रहिवाशांनी केले आहे. याचा मात्र आत्मचिंतन करावे लागत आहे. दरम्यान, सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गटाराचे पाणी तुंबल्यामुळे अनेक व्यवसायिकांच्या तळमजल्यावरील गाड्यांमध्ये पाणी शिरले . महत्वाचे कागद व यंत्रणा यांचे नुकसान झाल्याची चर्चा सुरू झालेली आहे.
_______________________
फोटो– जनाई मळाई डोंगरावरील माती मिश्रित पाणी शिरले घरात…